वडणगे : पावनखिंडीतील संग्राम हा हिंदवी स्वराज्याच्या संघर्षातील तेजस्वी पैलू असून, इतिहासात या संग्रामाला वेगळे महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले.वडणगे (ता. करवीर) येथील सिद्धी ग्रुपच्यावतीने पार्वती मंदिर परिसरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे महाप्रबंधक एम. आर. रावत होते. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, एस. डी. मुरगी प्रमुख उपस्थित होते.डॉ. आडके म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली. चिंचवाड परिसरात १६६० मध्ये शिवाजीराजांनी पहिली मैदानी लढाई करून ती जिंकली. परिसरातील अनेक किल्ले त्यांनी काबीज केले. शत्रूशी सामना करताना बचाव आणि जनतेचे कमीत कमी नुकसान व शत्रूची दमछाक करून जेरीला आणण्यासाठी पन्हाळा या गडाची त्यांनी निवड केली. हा डावपेच पूर्ण यशस्वी झाला.पावनखिंडीच्या रणसंग्रामात अग्रक्रमाने शिवा काशीद यांचे नाव घ्यावे लागेल. आपण मृत्यूच्या गुहेत मरायला चाललो आहोत, हे माहीत असूनही स्वराज्यासाठी, स्वामींसाठी आनंदाने ते सामोरे गेले. शिवाजी महाराजांचे रूप घेऊन एक दिवसाचा शिवाजी बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बलिदानातून सुरू झालेला पावनखिंडीचा रणसंग्राम बाजीप्रभूंच्या हौतात्म्यापर्यंत येऊन संपतो. मात्र, पन्हाळ्यावर खरा इतिहास सांगितला जात नाही, हे आपले दुर्दैव असल्याचेही डॉ. अडके म्हणाले.रणजित व्हरगे यांनी स्वागत केले. रणजित पाटील, संतोष पाटील, विश्वजित पाटील, सचिन केसरकर, प्रमोद पोवार, सचिन मगदूम, उमेश नांगरे, राजेंद्र जाधव, आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)
अमर आडके यांचे प्रतिपादन : वडणगे येथे सिद्धी ग्रुपच्यावतीने व्याख्यान
By admin | Updated: January 10, 2015 00:27 IST