लोकमत न्यूज नेटवर्क
पोर्ले तर्फ ठाणे : टोकाची राजकीय ईर्षा आणि अतिसंवेदनशील असणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय समजूतदारीतून झाली. ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेला क्रांतिकारक राजकीय निर्णय गावाच्या विकासासाठी हितकारक असल्याची भावना ग्रामस्थांतून होत आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे गटातटाच्या राजकारणातील भावाभावांचे राजकीय वैर संपुष्टात आले. त्यामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात या बिनविरोध निवडणुकीची चर्चा आहे. गावात राजकीय सुरुंग लागला तर त्याची कंपने वेशीपासून शेतीच्या बांधापर्यंत थडकायची आणि त्याची झळ सर्वसामान्यांना बसायची. दोन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात ॲड. विजय पाटील गट, प्रधान पाटील गट, मोरेश्वर लक्ष्मण मगर गट, हनुमान डेअरी गट आणि बाबासाहेब पाटील गट आशा या पाच गटातटांत गावाचं राजकारण होतं. आध्यात्मिक कामासाठी एकत्र येणारे हात राजकीय हेव्यादाव्यांसाठी उठले जायचे. याचा गावच्या विकासावर परिणाम झाला.
जागृत हनुमानाचा वारसा लाभलेल्या गावातील पोलीस पाटील बळवंत पाटील यांच्या मध्यस्थीने गटातटाच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला. ग्रामपंचायतीत पाच वर्षांचा फाॅर्म्युला तयार करून त्यावर एकमताने शिक्कामोर्तब झाले आणि हनुमानाच्या साक्षीने हात वर करून ते पाच वर्षांसाठी गावात राजकीय समजूतदारपणाच्या एक्सप्रेससाठी एकवटलेत हेच गावाच्या दृष्टीने निर्णायक ठरले.
बिनविरोध झालेले अधिकृत उमेदवार : अभिजित मनोहर पाटील, युवराज हरी पाटील, युवराज शिवाजी पाटील, सर्जेराव सखाराम कांबळे, शोभा संजय पाटील, राजश्री कृष्णा पाटील, छाया उदय पाटील, नंदिनी अमर पाटील, मनीषा संजय मगर.
................................
चौकट
भावाभावांतील संघर्षाला पूर्णविराम
गावात ॲड. विजय पाटील आणि प्रधान पाटील या चुलत भावांमधील मतभेदांमुळे गेली कित्येक वर्षे राजकीय संघर्ष टोकाचा होता; तर इतर गट ताकदीने राजकारण करीत होते. मागील काही निवडणुकांतील चढउतार घडामोडींचा अंदाज घेत, गटप्रमुखांनी गावच्या भल्यासाठी राजकीय पावले मागेपुढे घेत, पाच गटांनी समझोता करीत निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे चुलत भावांतील अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळाला.