मसूर : कऱ्हाड तालुक्यातील अवैध धंद्यासाठी प्रसिद्ध असलेला शामगाव घाट हा प्रवाशांसाठी असुरक्षित बिकटवाट बनत आहे. याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधण्यात आलेली पोलिस चौकी केवळ शोपीसच बनली आहे. पोलिस चौकीत एकही पोलिस कार्यरत नसल्याने ‘पोलिस चौकी नावाला... अन् एकही पोलिस नाही कामाला...!’ अशी अवस्था बनली आहे. परिणामी घाटातून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेता प्रश्न निर्माण झाला आहे.कऱ्हाड तालुक्यातील शामगाव घाट हा सातारा-सांगली जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा घाट लांब पल्ल्याचा नागमोडी वळणाचा असल्याने या मार्गावर कधी दिवसा तर कधी रात्री-अपरात्री शस्त्रांचा धाक दाखवून चोरी व लुटमारीचे अनेक प्रकार घडतात. विविध अवैध धंद्यांची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग जणू सोयीचाच बनला आहे. घाटाच्या डोंगर परिसरात पायथ्याला महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांपेक्षा प्रेमीयुगुलांचीच गर्दी अधिक असल्याचे दिसून येते. तेव्हा हा घाट म्हणजे कऱ्हाड, मसूर, उंब्रज, ओगलेवाडी, पुसेसावळी परिसरातील प्रेमीयुगुलांचे खास पर्यटन स्थळच म्हणावे लागेल.याठिकाणी येणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या असाह्यतेचा फायदा घेत त्यांना लुटण्याचे अनेक प्रकारही याठिकाणी घडले आहेत. मात्र, अब्रूच्या भीतीपोटी यांच्या तक्रारी कुठे दाखल झालेल्या नाहीत. लुटमार व चोरीच्या प्रकारामुळे या मार्गावरून रात्री-अपरात्री जाण्याचे प्रवासीही टाळतात.याच घाटात दिवेकर खून प्रकरण गाजले होते. तसेच रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांनी यापूर्वी कारवाईही केली आहे. या घाटात हैद्राबादवरून येणाऱ्या ३५ लाखांचा बेकायदेशीर वाहतूक करणारा गुटखाही पोलिसांनी पकडला होता. बारामती-पुणे जिल्ह्यांतील सराईत गुन्हेगारांची टोळी याच घाटात पोलिसांनी शिताफीने पकडली होती. एका शाळकरी मुलीला पळवून नेत लुटीचा बनाव करणाऱ्या एक रिक्षा चालकाचाही पर्दाफाश याच घाटात पोलिसांनी केला होता. अशा गंभीर व विविध गुन्ह्यांमुळे हा घाट नेहमी चर्चेत राहिला आहे. हा घाट सातारा, सांगली जिल्ह्याला जोडणारा असल्याने अनेक अवैध धंद्यांंची वाहतूक सातत्याने होत असते.अशा विविध कारणांसाठी वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरलेल्या या घाटात पोलिस चौकी (चेकनाका) व्हावा, अशी अनेक वर्षांपूर्वीची ग्रामस्थांची मागणी होती. त्याची दखल घेऊन घाटाच्या पायथ्याला पोलिसांचा चेकनाका उभारला. परंतु काही दिवसच येथे पोलिसांची ये-जा राहिली. तथापि, अलीकडच्या काळात पोलिसांचे दर्शन एकदाही झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना आखाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)प्रशासनाकडून उपाययोजनेची गरज...बंद अवस्थेत असलेला हा पोलिस चेकनाका अनेक वृक्षांनी वेढला आहे. रात्रीचा पेट्रोलिंंग नावाचा प्रकारही दुर्र्मीळ झाला आहे. त्यामुळे या चौकीत कोणीही पोलिस नसल्याचे सर्वश्रूत आहे. तेव्हा घाट परिसरात पोलिसांची धास्ती राहिली नाही. पोलिसांचे चुकून दर्शन झालेच तर ते या घाटात चिरीमीरी गोळा करण्यातच मश्गूल असतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सद्य:स्थितीत पोलिसाविना असलेला चेकनाका जणू शोपीसच बनला असूून, तो नावालाच उभारला आहे का?, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. या शामगाव घाटाची वाट सर्वांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बिकटवाट म्हणून चर्चेचा विषय बनली आहे.
पोलिस चौकी नावाला, अधिकारी नाही कामाला
By admin | Updated: January 21, 2017 21:16 IST