लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी १५० केंद्रे कार्यरत असून, आणखी २५० केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध करून देण्यासाठी ही पूर्वतयारी असून, याबाबत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या ६ लाख ३७ हजार २२७ इतके ४५ वर्षांवरील, तर ५ लाख ९ हजर ८१९ इतके ६० वर्षांवरील असे एकूण ११ लाख ४७ हजार ०४६ लाभार्थी लसीकरणासाठी अपेक्षित आहेत. यापैकी २ लाख ५० हजार लाभार्थ्यांचे २५ मार्चअखेर लसीकरण झाले आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आकडेवारीचा समावेश नाही. उर्वरित ९ लाख नागरिकांना पुढील २० दिवसांत लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध करून देणे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्राधान्याने मोठ्या गावांच्या ठिकाणी असणाऱ्या तसेच नेटसाठी चांगली रेंज ज्या ठिकाणी आहे, अशा उपकेंद्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एकाच दिवशी सर्वत्र लसीकरणाची वाढीव केंद्रे सुरू करण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने ती सुरू करण्यासाठी नियोजन सुरू आहे.
जिल्हा परिषदेकडील उपकेंद्रांवरील व्यवस्था जिल्हा आरोग्य अधिकारी डा. योगेश साळे, लसीकरण मोहीम समन्वय डा. फारूक देसाई, तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्याअंतर्गतचे नियोजन जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
चौकट
मुबलक लस पुरवठा आवश्यक
कोल्हापूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे काम नियोजनबध्दरित्या सुरू आहे. अजूनही लस नाही म्हणून कोणालाही परत पाठवण्यात आलेले नाही. परंतु आता १ एप्रिलनंतर एकदम मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी खऱ्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तसेच यापुढच्या काळात लसीचा पुरेसा पुरवठा आणि तो ही वेळेत होणे आवश्यक आहे.
आता मनुष्यबळ कुठले आणायचे
एकीकडे गेल्यावर्षी संकट काळात ज्यांनी सेवा दिली, त्यांचे मानधन अजून मिळालेले नाही. आता पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जर पुन्हा अशी सेवा घेण्याची गरज पडली, तर ही मंडळी कामासाठी कशी तयार होणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे तातडीने या सर्वांचे मानधन देण्याची गरज आहे.