शिरोळ : तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी काटाजोड लढतींचे चित्र स्पष्ट झाले. एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. २४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. माघारीच्या अंतिम दिवशी ९१४ अर्ज माघारी घेतल्यामुळे आता ४०१ जागांसाठी ९९४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोयीच्या आघाड्या झाल्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सकाळपासूनच झुंबड उडाली होती. ३३ ग्रामपंचायतींच्या ४२५ जागांसाठी १९६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर १९३२ अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. आज मंगळवारपासून प्रचाराचा नारळ फुटणार आहे. निवडणुकीत आखाड्यात उतरलेल्या इच्छुकांची मनधरणी करण्यात व त्यांची समजूत काढण्यात गावपुढाऱ्यांना अपयश आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बुबनाळ येथे अखेरपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न झाले. मात्र, याठिकाणी ११ पैकी केवळ तीन जागा बिनविरोध झाल्या.
...........
काट्याची टक्कर
तालुक्यात एकूण २४ जागा बिनविरोध झाल्या.
उमेदवारी अर्जांच्या मोठ्या संख्येमुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. आता ९९४ उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोयीच्या आघाड्या झाल्यामुळे काट्याची टक्कर पाहावयास मिळणार आहे.