कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कायापालट कार्यक्रमांतर्गत दोन वर्षांत जिल्ह्यातील ७३ पैकी ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) कॉर्पोरेट लूक मिळाला. खासगी रुग्णालयाच्या तोडीस तोड अशी सेवा आणि तीही मोफत मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत पूर्वीपेक्षा तिप्पट वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ) व विविध माध्यम प्रतिनिधींच्या टीमने काही ‘पीएचसीं’ना भेट दिल्यानंतर हे निदर्शनास आले.सन २०११-१२ पासून ‘कायापालट’ कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून आरोग्य केंद्र स्वच्छ व सुंदर केले. आरोग्य केंद्रातील सेवेबद्दल समाजात विश्वासार्हता निर्माण केली. माता व अर्भक मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून, समाजातील सर्वच घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याची धडपड सुरू आहे. तत्पर सेवा मिळत असल्याने खासगी रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण प्राथमिक आरोग्य केेंद्राकडे वळत आहेत. केवळ ‘कायापालट’ कार्यक्रमामुळे कार्यक्षेत्रातील गरोदर मातांची प्रसूती वाढली आहे. गुणवत्तापूर्ण सेवा व सुरक्षिततेमुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय कुटुंबांतील महिलाही प्रसूतीसाठी ‘पीएचसी’ची निवड करीत आहेत. सीईओ सुभेदार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर, आरोग्य सहायक संचालक डॉ. आर. बी. मुगडे, रुग्णकल्याण समितीचे जिल्हा समन्वयक पल्लवी नकाते, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या पथकाने महागाव आरोग्य केंद्रातील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. आरोग्य अधिकारी सुप्रिया खन्ना, गडहिंग्लजच्या गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी कामांची माहिती दिली. येथे देणगीदारांनी टी.व्ही., टेबल-खुर्च्या दिल्या आहेत. ऐनापुरातील उपकेंद्रातील आवारात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. गर्भवती महिलांनी तपासणी व आहार कसा घ्यावा, याची प्रबोधनपर लिहिलेली माहिती लक्षवेधी ठरली.मलिग्रे पीएचसीमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व्हीलचेअरही घेण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्य संजीवनी गुरव यांनी स्वागत केले. डॉ. आर. जी. गुरव यांनी माहिती दिली. दरम्यान, सर्वच पीएचसींना व्हीलचेअर घेण्याबाबत आदेश देणार असल्याचेही श्री. सुभेदार यांनी सांगितले. ( प्रतिनिधी )लोकसहभाग महत्त्वाचासमाजातील दानशूर व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानामुळे पीएचसींचा कायापालट झाला आहे. दर्जेदार, मोफत सेवा मिळत असल्याने रुग्णांची संख्या वाढते आहे. आता उपकेंद्राचाही कायापालट केला जाणार आहे. सकारात्मक आणि प्रभावी परिणाम दिसल्यामुळे संपूर्ण राज्यात कायापालट राबविण्याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतला असल्याची माहिती सीईओ सुभेदार यांनी दिली.
पीएचसींचा झाला ‘कायापालट’
By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST