जयसिंगपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर उपाययोजना राबविल्या जात आहेत. जयसिंगपूर शहरात आठवड्याभरात कोरोनाचे १६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरवासियांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, शुक्रवारी रंगपंचमीनिमित्ताने कोरोनाचे नियम तोडून तरुणवर्ग बिनधास्तपणे शहरात वावरत होता. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाच्या चिंतेत वाढ करणारी ठरत आहे. गतवर्षी मे महिन्यात कोरोनाचे १२ रुग्ण सापडले होते. यावर्षी गेल्या आठ दिवसात जयसिंगपूर शहरात तब्बल वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन अंकी झालेली ही संख्या तीन अंकी होण्याअगोदरच वाढत्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जनतेच्याही सहकार्याची अपेक्षा आहे. शहरातील कोरोनाचा ग्रामीण भागात शिरकाव होईल, या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर शिवाय सॅनिटायझरचा वापर करुन नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क नाही, वस्तू नाही याची अंमलबजावणी व्यावसायिकांनी करावी शिवाय भाजी, फळ विक्रेत्यांनाही मास्क वापरणे सक्तीचे करावे लागणार आहे. भाजी व फळ विक्रेत्यांच्या अॅन्टिजेन तपासणीचा विषय पुढे आला होता. त्याबाबतही पालिकेने नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरु आहे. ४५हून अधिक वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. याठिकाणी पालिका व आरोग्य प्रशासनाने नियोजन करुन लसीकरणाला गती देण्याची गरज आहे.