लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्याच्या कडेला वाहनेच वाहने दिसत आहेत. त्यातच शहरातील फुटपाथचा वापर वाहन पार्किंगबरोबर काही व्यावसायिकांकडून केला जात आहे. पे अँड पार्कची खरी गरज शहरात निर्माण होत आहे. प्रामुख्याने शहरात वाहनतळाची गरजदेखील बनली आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील आखीव-रेखीव शहर म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकामुळे क्रांती चौकात वाहतूक कोंडीची मोठी समस्या होते. वाहन पार्किंगचा आराखडा कागदावरच राहिला असताना वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंग कोठे करावे, हेच आता वाहनचालकांना सुचत नाही. ज्या अर्थाने शहरात फुटपाथ तयार करण्यात आले. त्याचा उपयोग होताना दिसत नाही.पायी ये-जा करणाऱ्यांना फुटपाथचा आधार असावा, हा उद्देश समोर ठेवून पालिकेने निधी खर्च केला. काही ठिकाणी तर वाहने फुटपाथवर लावली जातात. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुनही चालता येत नाही. वास्तविक वाहन व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणेबाबत नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. याबाबत प्रशासन यंत्रणेने दखल घेणे गरजेचे बनले आहे. रस्ता दिसेल तिथे वाहने लावा, अशी परिस्थिती शहरात बनली आहे. काही व्यावसायिकांनी फुटपाथचा वापर केल्याचे दिसून येते. शहरातील वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता पे अँड पार्कचे वाहन तळ उभे राहण्याची गरज आहे.
फुटपाथचा वापर पार्किंगसाठी
By admin | Updated: July 12, 2017 00:07 IST