राजाराम लोंढे - कोल्हापूर बाजार समितीच्या घाऊक बाजारात किरकोळ विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असताना, कोल्हापूर बाजार समितीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही राजकीय वरदहस्तामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये राजरोसपणे किरकोळ विक्री सुरू आहे. परिणामी बाजार समितीनेच सुरू केलेला मिनी मार्केटमधील व्यवसाय पूर्णपणे संपला असून, तेथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीने १९९३ ला गाळे बांधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे मिनी मार्केट तयार केले. या मार्केटमध्ये सुमारे शंभर गाळे आहेत. सुरुवातीच्या काळात एकेका व्यापाऱ्याचा दिवसाला तीन-चार हजार रुपये व्यवसाय व्हायचा; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून फळे व भाजीपाला मार्केटमध्येच किरकोळ विक्री सुरू केली आणि मिनी मार्केटमधील व्यवसायच संपला. घाऊक बाजारात माल घ्यायचा आणि तिथेच त्याची विक्री करण्याचे काम जवळपास शंभर व्यापारी करीत आहेत. याबाबत गेली चार वर्षे मिनी मार्केटमधील व्यापारी समितीकडे तक्रार करीत आहेत. समितीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने घाऊकमध्ये किरकोळ विक्री करण्याची संख्या वाढत आहे. परिणामी मिनी मार्केटमधील व्यवसाय संपला आहे. दिवसभर बसून शंभर रुपयांचाही व्यवसाय होत नसल्याने येथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मध्यंतरी, पुणे बाजार समितीमध्ये घाऊक मार्केटमध्ये किरकोळ विक्री होत असल्याचा वाद न्यायालयात गेला होता. यासारख्या विविध ठिकाणांहून याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. पणन कायद्यानुसार हे बेकायदेशीर असून, तशी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण कोल्हापूर बाजार समितीमध्ये राजरोसपणे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सुरू आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी बाजार समितीतील मिनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी समितीकडे तक्रार केली. त्यानुसार समितीने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या; पण समितीच्या एका बड्या नेत्याच्या आदेशामुळे पुन्हा ही कारवाई बारगळल्याची चर्चा सुरू आहे.दाद मागायची कोणाकडे?या व्यापाऱ्यांचे हातावरचे पोट असल्याने आतापर्यंत पाच-सहा वर्षे त्यांनी अन्याय सहन केला. दिवसभर गिऱ्हाईकच नसल्याने त्यांना असाहाय्यपणे बसावे लागते. अनेक वेळा तक्रारी करूनही समितीला पाझर फुटत नाही. समितीने कारवाई करण्यास सुरुवात केली की, राजकीय मंडळी ती दाबून टाकतात. न्यायालयीन आदेशाचा उघड-उघड अवमान होत असताना कोणालाही त्याची पर्वा नाही. अवमान याचिका दाखल करण्याइतपत त्या व्यापाऱ्यांची ताकद नाही; मग त्यांनी दाद मागायची कोणाकडे? जिल्हा उपनिबंधकांनी समितीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घाऊक बाजारातील किरकोळ विक्रीबाबत आम्ही समितीला निवेदन देऊन थकलो आहे. आमचा व्यवसाय संपल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाच्या आदेशाला ही मंडळी जुमानत नसतील तर आमच्यासारख्या गोरगरिबांचा आवाज ऐकणार कोण?- अकबर गोठेवाले (फळ विक्रेते, मिनी मार्केट) येत्या आठ-दहा दिवसांत सगळे व्यापारी मिनी मार्केटमध्येच जातील. घाऊक बाजारात कोणालाही विक्री करू देणार नाही. आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार काम करावे लागेल.- विलास साठे (उपसभापती, बाजार समिती)
न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली
By admin | Updated: August 27, 2015 00:31 IST