कोल्हापूर : प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देत अखिल भारतीय साहित्य संमेलनाला प्रतिशब्द म्हणून ‘विद्रोही साहित्य संमेलना’ची चळवळ सुरू झाली. या विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन त्याचा महाप्रवाह बनवला तर तो सत्ता उलथवून टाकेल, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले. बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज, गुरुवारी सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने पाटणकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पार्थ पोळके, डॉ. सतीश घाटगे, ज. रा. दाभोळे, डी. जी. भास्कर, बबनराव रानगे, आर. बी. कोसंबी, अनिल म्हमाणे उपस्थित होते. यावेळी पाटणकर यांचा घोंगडे, फेटा, हार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हे संमेलन २ व ३ आॅगस्टला येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये होत आहे.पाटणकर म्हणाले, वास्तववादी साहित्य बहुजनांनी, शोषितांनी निर्माण केले म्हणून विद्रोहीचे पहिले साहित्य संमेलन जाणीवपूर्वक मुंबईतील धारावीमध्ये घेतले. आता दिल्लीतील सत्ता नागपुरातून चालवली जाते. पण, विद्रोही, बौद्ध आणि दलित साहित्य मांडणारे एकत्र आले तर महाराष्ट्रात त्यांचा पराभव कोणी रोखू शकणार नाही. राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजनांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे वैदिक प्रकरण घडविले. आता महाराजांनी बहुजन उद्धारासाठी केलेल्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे. पोळके म्हणाले, ‘अखिल भारतीय’ नावाने जी साहित्य संमेलने होतात त्यात बहुजन साहित्यिक नसतो, वंचितांच्या जगण्याचे वास्तव नसले तरी अशा संमेलनावर सरकार लाखो रुपये उधळते. या विरोधात ही चळवळ सुरू आहे. संत तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबार्इंनी सामान्यांचे जगणे मांडले. दलित साहित्याने खऱ्या अर्थाने मराठीला सजग केले, पण ही वैदिक पद्धती विद्रोहाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कित्येक दाभोलकरांचे खून करत राहील. त्याच्याशी लढण्यासाठी सगळ््यांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी आर. बी. कोसंबी, सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब घस्ते यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
विद्रोहीचा महाप्रवाह सत्ता उलथवेल
By admin | Updated: July 18, 2014 00:28 IST