जयसिंगपूर/दानोळी/यड्राव : वारणा नदीचे पाणी इचलकरंजीच्या अमृत योजनेला देणार नाही, या विरोधात वारणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील गावांनी शुक्रवारी कडकडीत बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदविला आहे़ हे जनआंदोलन अमृत योजना नामंजुरीसाठी उभारले आहे़ वारणाकाठच्या गावांचा ठराव अमृत योजनेच्या विरोधात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याचा निर्णय वारणा बचाव कृती समितीकडून घेण्यात आला आहे़ वारणा नदीतून इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार हाळवणकर यांनी अमृत योजना मंजूर करून आणली आहे़ मात्र, या योजनेला वारणाकाठच्या गावांतून मोठा विरोध झाला आहे़ यामध्ये शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कवठेसार, यड्राव, कोथळी, उमळवाड, कुंभोज, हिंगणगाव, किणी, भादोले, खोची, नरंदे, नवे पारगाव, जुने पारगाव, घुणकी, वाठार, हिंगणगाव, तळसंदे, भेंडवडे, लाटवडे, चावरे, तर सांगली जिल्ह्यातील बागणी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, शिगाव, आदी गावे बंद ठेवून गावातील सर्व व्यवहार दिवसभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते़ दरम्यान, खऱ्या अर्थाने अमृत योजनेच्या विरोधात ही लढाई सुरू झाली आहे़ आमदार हाळवणकर यांनी इचलकरंजी शहरासाठी दानोळी येथील वारणा नदीतून पाणी नेण्यासाठी अमृत योजना मंजूर करून आणली आहे़ या विरोधात दानोळी येथे वारणा बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे़ या कृती समितीला वारणाकाठावरील सर्व गावांतून पाठिंबा मिळाल्यामुळे शुक्रवारी कृष्णाकाठावरील गावे कडकडीत बंद होती़ चांदोली धरणापासून वारणा नदीतील आपल्या हक्काचे पाणी अमृत योजनेला द्यायचे नाही यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वारणाकाठच्या गावांना भेटी देऊन या लढ्यात सामील करून समितीची ताकद वाढविली. याची सुरुवात शुक्रवारी शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या निर्णयाच्या विरोधात गावागावत कडकडीत बंद करून करण्यात आली़ दरम्यान, सायंकाळी पाचनंतर व्यवहार सुरळीतपणे सुरू झाला. कुंभोज, हिंगणगावला कडकडीतकुंभोज : वारणा नदीतून दानोळी येथून इचलकरंजी शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनास विरोध म्हणून कुंभोज, हिंगणगाव ग्रामस्थांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले. तारदाळ, खोतवाडीतही बंदतारदाळ : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीपात्रातून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्याला विरोध करण्यासाठी तारदाळ, खोतवाडी (ता. हातकणंगले) गावांनीही एकीचे बळ दाखवून शुक्रवारी व्यवहार बंद ठेवले. त्यासाठी या गावातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला. यावेळी पं. स. सदस्य रंगराव खांडेकर, सुकुमार कोळी, सुरेश पोवार, अशोक चौगुले, राहुल पोवार, सचिन चौगुले, यासीन मुजावर, विजय पाटील, रमेश नर्मदे, डॉ. संदीप खोत, तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.
इचलकरंजीच्या अमृत योजनेला बंदने विरोध
By admin | Updated: June 11, 2016 00:52 IST