कागल : केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर दोन्ही ठिकाणी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जात आहेत. देशाचे स्वरूप बदलत आहे. विरोधक काहीही म्हणोत, मात्र ‘देश बदल रहा है।’ हे सामान्य माणूसही मान्य करीत आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विविध योजना राबविल्या असून, राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना पाच लाख रुपये किंमत असणारे सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप देणार आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कागल येथे अयोजित विकासपर्व मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबा देसाई होते. यावेळी आ. सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संभाजीराव पाटील, परशुराम तावरे, अतुल जोशी, आदी प्रमुख उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार योजना असेल अथवा पाण्याचे आॅडिट असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये संधी शोधून पाणलोट क्षेत्रात विकास केला आहे. कोणताही गाजावाजा न करता वीजनिर्र्मिती केली आहे. उत्पादन वाढविले आहे. महात्मा गांधी आरोग्य योजनेत ११00 विविध आजारांवर मोफत उपचार, तर बाळासाहेब ठाकरे अपघात योजनेत पहिले तीन दिवस शासन रुग्णांची काळजी घेणार आहे. आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.कागल शहराध्यक्ष अरुण सोनुले यांनी स्वागत, तर अतुल जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी महिलांना गॅस कनेक्शन दिली आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांशी सामान्य माणूस जोडून काळा पैसा, नकली नोटा यावर निर्बंध ठेवले जाणार आहेत. तालुकाध्यक्ष परपशुराम तावरे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई यांची भाषणे झाली. तमनाकवाड्याचे सरपंच दत्ता चव्हाण यांनी आभार मानले.टीका टाळली...मेळाव्यात टीकाटिप्पणी होईल, असे वाटत होते. मात्र, मुश्रीफांवरील टीका टाळण्यात आली. आ. हाळवणकार यांनी सुरुवातीलाच सांगितले की, या मेळाव्यात मुद्दाम आलो नाही, तर मुश्रीफ यांना घाबरलो असे होईल, म्हणून आलो, तर चंद्रकांतदादांनी सांगितले की, कागल तालुक्यात भाजपला एवढी गर्दी बघून मला आनंद झाला आणि मला आनंद झाला की, मुश्रीफ यांच्या छातीत धडकी भरते, इतकीच टीकाटिप्पणी केली.सत्ता नसल्याने निधी देण्यात अडचण...चंद्रकांतदादा म्हणाले, ग्रामपंचायत काय, तर साध्या साध्या कोंबडी, बकरी संस्थांच्याही निवडणुका कार्यकर्र्त्यांनी लढविल्या पाहिजेत. केंद्रात, राज्यात सत्ता आहे; पण ग्रामपंचायती, नगरपालिका, पंचायती ताब्यात नसल्याने निधी देण्यात अडचणी आहेत. कारण काँग्रेसवाले ठराव देत नाहीत. कोल्हापूर महानगर पालिका, जिल्हा परिषद यांचे उदाहरण आहे. मला मोठा निधी द्यायचा आहे; पण ही मंडळी ठरावच देत नाहीत, असा आरोप केला.
विरोधक काहीही म्हणोत, ‘देश बदल रहा है।’
By admin | Updated: June 11, 2016 00:31 IST