कोल्हापूर : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य लक्ष्मी कांबळे यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली असून म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी ठेवली आहे. तीन अपत्ये असल्याची तक्रार आल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुनावणीनंतर अपात्रतेसंबंधी निर्णय होणार आहे.
नांगनूर ग्रामपंचायतीच्या २०१८ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लक्ष्मी कांबळे या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांना तिसरे अपत्य प्राप्त झाले. शासकीय नियमाप्रमाणे कोणतेही लाभाचे पद धारण करताना दोनपेक्षा अधिक अपत्ये असणारा अपात्र ठरवला जातो. याच नियमाचा आधार घेत विरोधी गटाचे सदस्य नेमीनाथ तेरदाळे यांनी वकील ॲड. अप्पासाहेब जाधव यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार याचिका दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार मैमुन्नीस्सा संदे यांनी कांबळे यांना याप्रकरणी अपात्र का करू नये, असे सांगत यावर तुम्ही स्वत: अथवा वकिलामार्फत लेखी म्हणणे मांडावे, अशी नोटीस काढली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमोरच सुनावणी होऊन त्याच दिवशी निर्णयही घेतला जाणार आहे.