हिरण्यकेशी नदीवर खणदाळ ते नांगनूर दरम्यान सध्या ७ बंधारे आहेत. त्याशिवाय सर्व्हिस रोडसाठी नवे ४ पूल बांधण्याचा घाट घातला जात आहे. त्याला नांगनूर ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून नियोजित नव्या पुलांना पर्याय काढण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार दिनेश पारगे यांना शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात उपसरपंच विकास मोकाशी, अरुण मोकाशी, श्रीराम पाटील, सुखदेव कासारकर आदींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत नांगनूरनजीकच्या सर्व्हिस रोडसाठी हिरण्यकेशी नदीवर चार नवे पूल बांधण्यासाठी दिल्लीस्थित एका कंपनीकडून पाहणी सुरू आहे.
परंतु, हिरण्यकेशी नदीवर नांगनूरजवळ दोन बंधारे, संकेश्वरच्या शंकरलिंग मठाजवळ एक बंधारा, राष्ट्रीय महामार्गावर २ पूल, कडलगेजवळ खोत बंधारा आणि खणदाळ बंधारा असे ४ किलोमीटरच्या अंतरात ७ बंधारे आहेत. त्यात ४ नव्या बंधाऱ्यांची भर पडणार आहे.
नांगनूर परिसरातील सध्याच्या ७ बंधाऱ्यांमुळे व नियोजित नव्या ४ बंधाऱ्यांमुळे हिटणी, खणदाळ, नांगनूर, अरळगुंडी, कडलगे या गावातील शेती व नागरी वस्तीला महापुराचा धोका आणखी वाढणार आहे. त्यामुळे नवे पूल रद्द करावेत व त्यासाठी पर्यायी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट :
आमदारांकडेही तक्रार
नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीवर प्रस्तावित नव्या ४ पुलांमुळे महापुराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे प्रस्तावित पूल रद्द करावेत, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांच्याकडेही नांगनूर ग्रामस्थांनीही केली आहे.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे नांगनूर ग्रामस्थांतर्फे उपसरपंच विकास मोकाशी यांनी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन दिले. यावेळी अरूण मोकाशी, सुखदेव कासारकर, श्रीराम पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : २४०९२०२१-गड-११