कोल्हापूर : महानगरपालिकेच्या बागा म्हणजे नागरिकांना स्वच्छ हवेत फिरण्याच्या ठिकाणाऐवजी मद्यपींसाठीची एक उत्तम सोय झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, पहारेकऱ्यांची मद्यपींवरील मर्जी यामुळे बागांना आता ‘ओपन बार’ची अवकळा प्राप्त झालीय. शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात रात्रीच्या पार्ट्यांना एवढा जोर चढला आहे की, सांगायची सोय राहिली नाही. रात्री घाण करणार, बाटल्या फोडणार मद्यपी आणि बाग स्वच्छ करणार सकाळी फिरायला येणारे नागरिक! अशीच काहीशी बिकट अवस्था या उद्यानाची झाली आहे. शिवाजी पेठेत रंकाळा तलावाला लागूनच हे पद्माराजे उद्यान आहे. अलीकडे या उद्यानाला मद्यपी आणि रस्सा मंडळ करणाऱ्या मंडळींची दृष्ट लागली आहे. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसायला लागलाय.उद्यान विभागाकडे तक्रारी केल्या की, एकाच दिवशी स्वच्छता केली जाते. तक्रार करून थकलेल्या काही महिलांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार नोंदविली आणि आपण काही तरी आवाज उठवा, अशी विनंती केली. उद्यानात रात्री पार्टी झाल्यावर काही मद्यपी दारूच्या बाटल्या फोडतात. अन्नपदार्थ तेथेच टाकतात. पत्रावळ्या, प्लास्टिक चे ग्लास टाकतात. त्यामुळे उद्यान एकप्रकारचा कोंडाळा बनलेला असतो. सकाळी १०० ते १२० महिला, पुरुष या उद्यानात मोकळ्या हवेत फिरायला येतात. अॅक्युपे्रशर ट्रॅकवरून चालण्याचा सराव करतात; पण उद्यानात येताच फिरण्याच्या मार्गावर सर्वत्र घाणीचे, काचांचे सडे पडलेले असतात. अनेक वयोवृद्ध पायात काचा घुसून रक्तबंबाळ झाले आहेत. साफसफाई करायला कोणी कर्मचारी येत नसल्यामुळे फिरायला येणाऱ्या महिला आधी उद्यान साफ करतात, मग फिरण्याचा व्यायाम करतात. एखादा दिवस स्वच्छता केली तर ठीक, पण अशी किती दिवस स्वच्छता करायची, असा प्रश्न फिरायला येणाऱ्या महिलांना पडलेला आहे. (प्रतिनिधी)महिलांच्या मते या उद्यानात जेवणावळीसाठी येणाऱ्या लोकांमध्ये कर्मचारीच सामील झालेले असतात. त्यामुळे ते अशा मंडळींवर अंकुश ठेऊ शकत नाहीत. महापालिकेने आधी या कर्मचाऱ्यांची साफसफाई करावी आणि मग मद्यपींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
महापालिकेचे उद्यान ‘ओपन बार’च
By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST