संदीप बावचे- शिरोळ नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पाठोपाठच श्री क्षेत्र नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आॅगस्ट २०१६ ला कन्यागत महापर्वकाल उत्सव साजरा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खासदार व आमदार यांनी कन्यागतच्या पार्श्वभूमीवर मी विकासकामासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली असली, तरी खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कन्यागत महापर्वकालाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी येथे आज, शुक्रवारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. येत्या वर्षात येथे आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी भरीव निधी देऊन पालकमंत्री विकास साधणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांचे पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.नृसिंहवाडी येथे एका तपानंतर म्हणजे बारा वर्षांनी नाशिक कुंभ मेळ्याच्या धर्तीवर कन्यागत महापर्वकाल उत्सव साजरा केला जातो. येत्या ११ आॅगस्ट २०१६ ला हा उत्सव साजरा होणार आहे. कन्यागतच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यांतील भाविक येथे हजेरी लावतात. दरम्यान, नृसिंहवाडीतील अनेक विकासकामे होणे आवश्यक असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. बहुमजली पार्किंग, स्वागत कमान, मंदिर रस्ता, नदीघाट अष्टशुल्क तीर्थ बांधकाम व सुशोभीकरण, विठ्ठल मंदिर सांस्कृतिक भवन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कृष्णा घाटावरील पूल, शौचालये व स्वच्छतागृहे, क्रीडांगण, शासकीय विश्रामगृह, आदी प्रमुख प्रश्न प्रलंबित आहेत. नृसिंहवाडीबरोबर शिरोळ येथील भोजनपात्र मंदिरासही तितकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमदार उल्हास पाटील यांनी कन्यागत महापर्वकाल उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आवश्यक असणारी विकासकामांची मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यापूर्वीच केली आहे, तर कन्यागतच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कन्यागत उत्सवाच्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नृसिंहवाडी येथे सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्र्यांनी बोलाविली आहे. अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपलेल्या कन्यागत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेल्या विकासकामांना मंजुरी मिळण्याची गरज आहे.प्रलंबित प्रस्तावबहुमजली पार्किंगसाठी शासनदरबारी दहा कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे. नदीघाट सुशोभिकरणातून सेवा सुविधांसाठी शासनाकडे ८० लाखांचा प्रस्ताव आहे. तो मंजूर होण्याची गरज आहे. वाढत्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी चार कोटींची मागणी ग्रामपंचायतीची आहे, तर संभाजीनगरमधील क्रीडांगणासाठी ७५ लाखांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. कन्यागत महापर्वकाल उत्सवासाठी खासदार, आमदार यांच्याकडून सहकार्य मिळत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडूनही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. प्रलंबित असलेल्या कामांना निधी मंजूर होऊन काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशीच अपेक्षा आहे.- शशिकांत बड्डपुजारीअध्यक्ष, श्री दत्त देवस्थान, नृसिंहवाडी
नृसिंहवाडीचे प्रलंबित प्रश्न ‘दादा’ सोडविणार?
By admin | Updated: September 3, 2015 23:54 IST