दत्तवाड : टाकळवाडी (ता. शिरोळ) येथे रात्रीत घरे उभारली जात आहेत. याची चर्चा मात्र ग्रामपंचायत निवडणुकीशी जोडली जात आहे.
टाकळीवाडी येथे सध्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. सर्व नेते, कार्यकर्ते प्रचारात गुंतले असताना, गावच्या मोकळ्या माळावर गावातीलच काही नागरिक मोकळी जागा हेरून सिमेंट, विटा घेऊन रात्रीत घरे बांधत आहेत. गेल्या दोन दिवसांत पंधरा घरे बांधून झाली असून, आणखी काही घरांचे बांधकाम जोरात सुरू आहे. या घरांसाठी विटा, सिमेंट, व ग्रिट कुठून येते, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीशी याचा थेट संबंध असल्याचे बोलले जात आहे. अचानक उधारीवर विटा, सिमेंट देऊन इतकी घरांचे बांधकाम कसे सुरू आहे, याबाबतचा वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
दरम्यान, ग्रामसेवक मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधणाऱ्या घरांना नोटीस दिली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी झालेल्या अतिक्रमणाबाबत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसून, गेल्या वीस वर्षांपासून टाकळीवाडी येथील माळावर अतिक्रमणे सुरूच आहेत.