दत्ता पाटील म्हाकवे : नैसर्गिकदृष्ट्या मागासलेले आणि हमालांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिराचीवाडीने सरपंच सुभाष भोसले यांच्या पुढाकाराने एकजूट दाखवत गावचे नाव जिल्ह्याच्या नकाशावर कोरले. दुर्गम, डोंगराळ सोयी-सुविधांअभावी मागे राहिलेल्या या गावाने झपाटल्याप्रमाणे केवळ दोन वर्षांत गावाचा कायापालट केला. एकसंधपणे घेतलेल्या परिश्रमाचे जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने चीज झाले.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव हा पुरस्कार पिराचीवाडी गावाला जाहीर झाला.
सरपंच सुभाष भोसले यांनी सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने कोट्यवधीचा निधी खेचून आणला. कल्पनाविलासात रंगून जावी अशी वैकुंठभुमी, सुसज्ज, सोयीनीयुक्त ग्रामपंचायत इमारत, गावात सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यांंच्या दुतर्फा झाडे, बंदिस्त गटारे, ऐतिहासिक तलाव यामुळे गावचे रूपडेच पालटले आहे.
दरम्यान, प्रत्येक कामासाठी शासकीय निधीची वाट न पाहता भोसले यांनी नदीतून तीन टप्प्यांत पाणी योजना, ऐतिहासिक बुरुजांची डागडुजी, संपूर्ण गावातील झाडे त्यांंना ठिबक यासाठी लाखो रुपये स्वतःच खर्ची घातले आहेत.
मुश्रीफांचे पाठबळ : भोसले
गावातील विकासाचे श्रेय सरपंच भोसले यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकले. गल्ली-बोळातील समस्या आणि सामान्य माणसाच्या गरजा माहीत असणारे मुश्रीफांसारखे ग्रामविकासमंत्री लाभणे हे भाग्यच आहे. त्यांच्या भक्कम पाठबळानेच आम्ही यशोशिखरापर्यंत पोहोचू शकलो. तसेच, जि. प. सदस्य मनोज फराकटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे भोसले यांनी सांगितले.