शुभम गायकवाड / उदगाव : सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. वाढत्या वाहतुकीमुळे हा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी आंदोलनेही झाली आहेत. सांगली-कोल्हापूर मुख्य महामार्ग हा उदगावच्या प्रवेशद्वारातूनच जातो. वाहतुकीच्या कोंडीची सुरुवातच उदगावपासून होत आहे. कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे उदगावच्या प्रवेशद्वारालाच ही परिस्थिती असल्याने गावचा श्वास गुदमरत आहे. उदगाव हे कोल्हापूर जिल्ह्याचे सुरुवातीचे गाव आहे. लगतच दोन औद्योगिक वसाहती आहेत. याच मार्गावरून पाच साखर कारखान्यांची वाहतूक सुरू असते. अवजड वाहतूक उदगाव-शिरोळ बायपास मार्गाने करावी; तर सामान्य वाहतूक उदगाव-जयसिंगपूर मार्गे करावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. तरीदेखील वाहनचालक मनमानी करीत असल्याने वाहतूक समस्या निर्माण होत आहेत.
गेल्या महिन्याभरात अपघातात सहाजणांनी जीव गमावला; तर पंधराजण जखमी झाले आहेत. उदगावच्या रेल्वे पुलाजवळील कमानही अवजड वाहतुकीमुळे पडली होती. असे असतानाही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. जर अवजड वाहतूकदार त्यांची मनमानी करीत असतील यावर मोठे आंदोलन करू, अशी नागरिकांची भूमिका असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
-----------------
कोट -
उदगाव येथील रेल्वे पूल व रिलायन्स पंप येथे पांढरे पट्टे मारणे व गतिरोधक बसविणे, दिशादर्शक फलक लावणे अशा उपाययोजना आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू; तर टेक्निकल शाळेजवळही विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून पांढरे पट्टे मारण्यात येतील.
- जे. सी. बागवान, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम
-------------------- कोट
सांगली-कोल्हापूर महामार्ग हा नेहमीच वर्दळीचा आहे. त्यावर रस्ता चौपदरी करणे, उड्डाणपूल बांधणे हे प्रश्न उच्चस्तरीय जरी असले तरी स्थानिक प्रशासनाने सामान्य उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- अशोक वरेकर, उदगाव ग्रामस्थ.
फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगावच्या प्रवेशद्वाराला वाहतुकीच्या कोंडीला सुरुवात होते.