गडहिंग्लज : शेतकऱ्यांसह गावाच्या सोयीसाठीच पाणंद रस्ते आहेत. त्यांच्यावर कोणाचीही खासगी मालकी नाही. त्यांच्यावरील अतिक्रमणे दूर करून पाणंदी आनंदी करण्यासाठी लोकचळवळीची गरज आहे, असे मत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी व्यक्त केले.
महाराजस्व अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील पाणंद खुली करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. तहसिलदार दिनेश पारगे, पंचायत समितीचे सदस्य विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पांगारकर म्हणाल्या, पाणंद रस्ते खुले करण्यासाठी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र आणा.
वादाच्या ठिकाणी मोजणी करून घ्या. याप्रसंगी काही सरपंचांनी गावातील पाणंद रस्ते खुले करण्यासंदर्भात निवेदनेही दिली.
चर्चेत विकास मोकाशी, रवींद्र घेज्जी, प्रशांत देसाई, रामचंद्र पाटील यांनी सहभाग घेतला.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, नायब तहसीलदार विष्णू बुटे, सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवू....!
पाणंद रस्त्यासह गायरानातील अतिक्रमणासारखे अनेक प्रश्न गावागावांमध्ये आहेत. ज्या समस्या सहज सुटणाऱ्या आहेत, त्या तातडीने सोडवू. त्यानंतर एक-एक गाव घेऊन तेथील प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवूया, असेही पांगारकर यांनी सांगितले.
याकडे काळजीपूर्वक पहा...!
काही पाणंद रस्ते दोन किंवा तीन गावांना जोडलेले आहेत. शहरालगतच्या गावातील पाणंद रस्ते शहराशी किंवा मोठ्या रस्त्यांशी जोडले आहेत. असे रस्ते खुले करताना भविष्यकालीन वापर लक्षात घेऊन ते काळजीपूर्वक खुले करा, अशी सूचनाही पांगारकर यांनी केली.
--------
'लोकमत' इम्पॅक्ट..!
गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ८० पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यासाठी खास मोहीम राबविण्याची गरज आहे, असे वृत्त 'लोकमत'ने शुक्रवारी (दि. १२) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन महसूल खात्याने महाराजस्व अभियानांतर्गत अतिक्रमित पाणंदी खुली करण्याची मोहीम आखली आहे. बुधवारी (दि. १७) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे.
------
फोटो ओळी-
गडहिंग्लज येथील बैठकीत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील, विष्णू बुटे, विद्याधर गुरबे उपस्थित होते.