लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : समाजातील जाती भेद, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर या महापुरुषांनी लढाई केली आहे. आताच्या काळात स्मशानभूमीत बाळाचा नामकरण सोहळा करणे ही क्रांतिकारक बाब आहे, असे मत कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले.
सतीश जारकीहोळी यांच्या मानव बंधुत्व वेदिकेचे कार्यकर्ते बाळू बरगाले यांच्या नातवचा नामकरण सोहळा स्मशानभूमीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री विरकुमार पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आ. काकासाहेब पाटील, सुनील हनमणवर, जि.प. सदस्य राजेंद्र वडर आदी उपस्थित होते.
जारकीहोळी पुढे म्हणाले की, गावागावात आता मंदिरे उभी करण्यापेक्षा शाळा उभारल्या पाहिजेत. हुन्नरगीसारख्या छोट्या गावात स्मशानभूमीत नामकरण सोहळा होणे हा ऐतिहासिक क्षण आहे. या उपक्रमाने बरगाले यांनी आदर्श निर्माण केला आहे.
माजी आ. काकासाहेब पाटील म्हणाले बुद्ध, बसव, आंबेडकर यांचा मानवतावाद अमलात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जारकीहोळी यांनी सुरू केले आहे.
हुन्नरगीमधील नूतन सदस्यांचा सत्कार जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, अशोक कुमार असोदे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, यांच्यासह मानव बंधुत्व वेदिकेचे सदस्य परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रशेखर हिरेमठ यांनी केले, तर आभार राहुल गुरव यांनी मानले.
नाव ठेवले ‘भीमराव’
स्मशानभूमीत नामकरण सोहळा झालेल्या बालकाचे नाव ‘भीमराव’ असे ठेवण्यात आले. बालकाचे वडील हे शिक्षक असून आई ग्रा.प. सदस्या आहेत.
फोटो : हुन्नरगी : नामकरण सोहळ्यात सतीश जारकीहोळी यांनी मार्गदर्शन केले.