विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर त्याचे निमित्त शोधून कागल तालुक्याच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्यातील कार्यकर्त्यांत दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले सख्य असताना कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावरून एकमेकांना आव्हान देऊ लागले आहेत. या घडामोडींकडे राजे गट बारकाईने नजर ठेवून आहे.
सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मंडलिक गटाने दिवंगत मंडलिक यांचे मोठेपण सांगणारी पोस्ट व्हायरल केली. जी मुश्रीफ यांच्या जखमेवरील खपली काढणारी होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मंगळवारी मुश्रीफ गटही मैदानात उतरला. त्यांनीही सकाळीच एक पोस्ट व्हायरल केली. ती अशी : मुश्रीफसाहेबांवर आरोप झाल्यानंतर आतून खूश झालेले ढोंगी मित्र आणि षंढ शत्रू यांचाही वेळ आल्यावर हिशेब होणार. नंतर नाही म्हणायचं नाही. कोण कसा वागला हे आम्हीबी ध्यानात ठेवलंय. आणखी एक पोस्ट अशी : हे कुणीच विसरू नये की, वेळ प्रत्येकावर येते. आम्हीही त्यांचा आदर करतो; पण आज हे करायची वेळ नव्हती. काम करणारा माणूसच नेहमी अडचणीत येतो. जो काय करत नाही त्यांना हे कसे समजणार? आमच्या नेत्याचा स्वाभिमान डिवचण्याचा कुणी प्रयत्न करू नये; नाहीतर....
मंडलिक गटाच्या कांहीनी त्याच्या पुढे जावून मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्या कागलमधील मनोमिलनाच्या सभेतील दोघे एकमेकांचे मोठेपण सांगणारी भाषणेच शेअर केली. त्यामुळे त्यातून कार्यकर्त्यांना नेमके काय सूचवायचे आहे याचीही चर्चा सुरु झाली.
असे घडण्यामागे दोन-तीन घटना कारणीभूत आहेत. त्याला पहिले कारण अर्थातच ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे. या निवडणुकीत मुश्रीफ यांचे वारसदार नविद मुश्रीफ व विरोधी आघाडीतून अंबरीश घाटगे विजयी झाले; परंतु वीरेंद्र मंडलिक पराभूत झाले. या दोघांनी अंतर्गत ॲडजेस्टमेंट करून विजय मिळविला व त्यात वीरेंद्र लक्ष्य झाले असे मंडलिक गटातील तरुण कार्यकर्त्यांना वाटते. वीरेंद्र यांच्या पराभवास महालक्ष्मी दूध संघातील थकलेली बिले, एकाच घरात पदे देण्याबद्दलची नाराजी आणि त्यांनी स्वत: जी यंत्रणा संपर्कापासून पाकिटापर्यंत लावायला हवी होती ती लावण्यात ते कमी पडल्याचीही कारणे आहेत. सत्तारूढ गटाकडून वीरेंद्र यांची नाराजी लक्षात घेऊन त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत संचालक म्हणून घेतले जाणार हे स्पष्टच आहे. परंतु तरीही या दोन गटांतील त्या पराभवापासून सुरू झालेली अविश्वासाची भावना दिवसेंदिवस वाढत आहे.
बेरजेचे राजकारण
मुश्रीफ यांनी विधानसभेसाठी बेरजेचे राजकारण म्हणून त्यांचे पारंपरिक विरोधक संजयबाबा घाटगे यांच्याशी जुळवून घेतले आहे. विधानसभेची आणखी एक निवडणूक मुश्रीफ लढवणार आहेत, हे त्यांनीच जाहीर केले आहे. या मतदार संघाचे ते आमदार असल्याने महाविकास आघाडीतून तेच उमेदवार असणार हे स्पष्टच आहे. अशा स्थितीत त्यांच्याशी वैरत्व पत्करून राजकीय नुकसान करून घेण्यापेक्षा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेचा लाभ करून घेण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेनेही त्यांच्या कारखान्यास आर्थिक मदत केली आहे.
फरक असाही...
मुश्रीफ यांच्यावर आरोप झाल्यावर लगेच त्याच दिवशी संजयबाबा घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावरील आरोप म्हणजे लोकहिताला बाधा असल्याची प्रतिक्रिया दिली. याउलट खासदार मंडलिक यांचे मात्र आरोपानंतर तब्बल पाच दिवसांनी पत्रक निघाले. मुश्रीफ यांनी राज्याच्या राजकारणात उंची गाठली असून या आरोपांना ते धैर्याने सामोरे जातील, असे त्यात म्हटले होते.