कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याच्या मृत्यूबाबत प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. उमेश राजाराम सामंत (वय ५३, रा. परुळे, मांजर्डेवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) असे त्या खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. राजेंद्र बाबू कांबळे व भीमराव बबन शिंदे (दोघे, रा. कळंबा कारागृह) या दोघा कैद्यांनी त्याचा घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पत्नीच्या हत्येच्या आरोपावरून उमेश सामंत हा २०१३ पासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सद्या तो खुल्या कारागृहातील जनावरांचा गोठा व शेती देखभालीची कामे करीत होता. रविवारी दुपारी चक्कर येऊन पडल्याने त्याला बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात छातीच्या दोन्हीही बाजूला मार लागल्याने बरगड्या तुटून अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी सकाळी पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांची झोप उडाली. खुनाच्या संशयाच्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी थेट कळंबा करागृहात जाऊन घटनास्थळाची पाहणी करून काही कर्मचारी, कैद्यांकडे चौकशी केली. त्यावेळी कारागृह आवारात बंधारा बगीचा परिसरात कैदी कांबळे व शिंदे हे मृत सामंत याच्यासोबत असल्याचे अनेकांनी सांगितले. त्या दोघांनीच सामंत याला चक्कर व हदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. परिस्थितीवरून त्यांच्यावरच संशय बळावला.
पाच कर्मचारी, नऊ कैद्यांची चौकशी
शवविच्छेदन अहवालानुसार खुनाचा संशय बळावल्याने पोलिसांनी कारागृहातील पाच कर्मचारी, तसेच त्याच्या संपर्कातील नऊ कैद्यांची कारागृहात जाऊन कसून चौकशी केली. यामध्ये मृत उमेश सामंत याच्यासोबत खुल्या कारागृहातील कैदी राजेंद्र कांबळे व भीमराव शिंदे यांच्याकडे चौकशीत विसंगत माहिती मिळाल्याने त्यांच्यावर संशयित म्हणून गुन्हा नोंदविला. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
पत्नीच्या हत्येबद्दल जन्मेठेपेची शिक्षा
उमेश सामंत हा एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून नोकरीस होता. त्याचा मामाच्या मुलीशीच विवाह झाला होता. त्याला मुलगा व मुलगी होती. मार्च २०१२ मध्ये निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परुळे, मांजर्डेवाडी (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथे पत्नीच्या हत्येबद्दल त्याला अटक झाली होती. न्यायालयाने त्याला मार्च २०१३मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कळंबा कारागृहात तो शिक्षा भोगत होता.
मुलांनी नाकारले, पोलिसांनीच उरकला अंत्यविधी
मृत उमेश सामंत याचा त्याच्या मामाच्या मुलीशीच विवाह झाला होता. सामंत याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना रविवारीच कळविले. सामंत हा शिक्षा भोगत असताना त्याची दोन्ही मुले मामाकडेच वाढली. त्यामुळे दोन मुलांसह मामा हे मृताबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरिता मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. मुलांनी सह्या करून पूर्तता केली; पण आमच्या पित्यानेच आईचा खून केला व आम्ही मामाकडेच वाढलो असे सांगून पित्याचा मृतदेह घेण्यास दोन्ही मुलांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनाच त्या मृतदेहाचा अंत्यविधी उरकावा लागला.
(तानाजी)