इचलकरंजी : राज्य शासनाने नगरपरिषद कामगारांच्या विविध मागण्यांबाबत दुर्लक्ष केल्याने नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व इचलकरंजी नगरपरिषद सर्व कामगार कृती समितीच्यावतीने १ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. याबाबतचे निवेदन कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने व पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.
निवेदनात, नगरपरिषदांना सहायक अनुदान वेळेवर मिळत नाही. तसेच ते अपुरे मिळते ते सहायक अनुदान वाढवून व वेळेत मिळावे. लाड पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे सफाई कर्मचारी याची नोकरभरती सुरू करावी. १०,२० व ३० वर्षेची कालबद्ध पदोन्नती मिळावी. सातव्या आयोगातील फरक मिळावा, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांच्यासोबत झालेल्या कामगारांच्या दोन प्रलंबित मागण्यांबाबत बैठक झाली असून, यावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिष्टमंडळात ए. बी. पाटील, शिवाजी जगताप, धनंजय पळसुले, हरी माळी, संजय कांबळे, विजय पाटील, मिलिंद वेदपाठक, पांडुरंग कोकरे, राहुल आवळे, अभिमन्यू कुरणे यांचा समावेश होता.