राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात कोल्हापूर मनपा व त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. तत्पूर्वी ‘राजाराम’ची निवडणूक घेण्यासाठी विरोधी आघाडी प्रयत्नशील आहे. कराडच्या ‘कृष्णा’ साखर कारखान्याच्या धर्तीवर न्यायालयात जाऊन जुलैपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता येईल, का याची चाचपणी सुरू आहे.
विधानपरिषद, लोकसभा, विधानसभेनंतर ‘गोकुळ’ ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली हाेती. ‘गोकुळ’मध्ये त्यांनी मोट बांधून तेही पदरात पाडून घेतले. ‘गोकुळ’ची बांधणी करताना ‘राजाराम’ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नेत्यांना सोबत ठेवण्याची मुत्सद्दीगिरी त्यांनी दाखवून दिली. ‘गोकुळ’मधील नेत्यांची मोट ‘राजाराम’मध्ये पुढे कायम ठेवून कारखाना ताब्यात घेण्यासाठी मंत्री पाटील यांचे प्रयत्न आहेत. कोरोनामुळे राज्य शासनाने ऑगस्ट २०२१ पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूक घ्यायच्या झाल्यास न्यायालयातूनच यावे लागणार आहे. ‘कृष्णा’ कारखान्याचे ४६ हजार सभासद आहेत, त्याच पार्श्वभूमीवर ‘राजाराम’ची निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल करायची आणि जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.
वाढीव सभासदांचा विषय न्यायालयात प्रलंबित
‘राजाराम’च्या १३४६ वाढीव सभासदाचा वाद उच्च न्यायालयात आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक (साखर) व सहकार मंत्र्यांनी हे सभासद रद्द केले आहेत. त्याविरोधात सत्तारूढ गटाने याचिका दाखल करत वाढीव सभासदांचा निकाल होईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली. मात्र ही याचिका अद्याप प्रलंबित आहे.
माने यांच्या राजीनाम्याने निवडणुकीचे संकेत
‘राजाराम’चे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीच्या चर्चेला पुन्हा जाेर धरला आहे. निवडणूक कधीही लागू शकते, ऐन निवडणुकीत अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दुसरा विचार केला तर तो सभासदांच्या पचनी पडणार नाही, यासाठीच निवडणुकीचा अंदाज घेऊनच माने यांनी राजीनामा दिल्याची सध्या चर्चा आहे.
सत्तारूढ गटाकडून साधव हालचाली
‘गोकुळ’ची सत्ता हातातून गेल्यानंतर महादेवराव महाडीक यांनी ‘राजाराम’बाबत फार सावध हालचाली सुरू केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. त्यासाठी विविध कारणाने नाराजी झालेल्या जुन्या मंडळींना सोबत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावनिहाय सभासदांशी संपर्कावर त्यांनी भर दिला आहे.
दृष्टिक्षेपात ‘राजाराम’- कार्यक्षेत्र - हातकणंगले, करवीर, राधानगरी, गगनबावडा, कागल, पन्हाळा, शाहूवाडी.
गावे - १२२
सभासद- ‘अ’ वर्ग : १७३०२
‘ब’ वर्ग सहकारी संस्था : १४३
ऊस गाळप- ४ लाख १० हजार ८८८ टन
संचालक संख्या - १८, तज्ज्ञ संचालक -२, कार्यलक्षी संचालक-१.
सत्ता - तीस वर्षे महादेवराव महाडीक यांची एकहाती सत्ता