इचलकरंजी : येथील विविध समस्या व मागण्यांबाबत सोमवारी दिवसभरात सहा मोर्चे काढण्यात आले. तसेच नगरपालिकेतील अनागोंदीविषयी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. जैन समाजाचा संथाराबाबत मूक मोर्चा, ख्रिस्ती समाजाचे प्रांतांना निवेदन व निदर्शने, मनसेचे निवेदन, तसेच रिक्षा संघटनांचे नगर पालिकेस निवेदन, असा आंदोलनाचा दिवस होता. पालिकेतील अनागोंदीविरोधी उपोषण इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि काही अपहाराच्या प्रकरणाबाबत गेली दहा वर्षे वारंवार तक्रारी करूनसुद्धा नगरपालिका दखल घेत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांची योग्य ती दखल घेऊन चौकशी व्हावी, यासाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, चौकशी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. पालिकेमध्ये वारंवार तक्रार करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये नळाच्या दोन हजार बोगस जोडण्या, खताची चोरी, कचरा प्रश्न, बांधकामाचे सर्व नियम पायदळी तुडवून फसवणूक करणारे बिल्डर, अशा गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. अशा सर्व प्रश्नांबाबत नगरपालिकेने लक्ष घालून याची सखोल चौकशी सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी दिलीप माणगावकर, अभिजित पटवा, इराण्णा सिंहासने, प्रसाद दामले हे उपोषणाला बसले आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजता नगरपालिकेत अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. तेथून मोटारसायकल रॅलीने मुख्य मार्गांवरून फिरून जुन्या नगरपालिकेसमोर उपोषणाला सुरूवात केली. उपोषणाला विविध सामाजिक व काही राजकीय पक्षांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. दरम्यान, विद्यमान नगरसेवक मोहन कुंभार यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला. (वार्ताहर) ख्रिस्ती समाजाचे विविध मागण्यांचे प्रांतांना निवेदन इचलकरंजी : भारतात गेल्या काही महिन्यांपासून ख्रिस्ती समाजाच्या चर्चवर समाज कंटकांकडून होत असलेले हल्ले, तसेच १५ आॅगस्टला काळेवाडी - पुणे येथील झालेल्या प्रार्थना सभेमध्ये घुसून मारहाण, चोरी व विनयभंग केला. या घटनांचा येथील शांतिदूत सेवा संस्थेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, समाजाच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.निवेदनामध्ये, रविवारच्या व इतर प्रार्थना, सभा, ख्रिस्ती शाळा, दवाखाने, अनाथालये अशा संस्थांना संरक्षण द्यावे, उपासनेत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, चर्च बांधण्यासाठी निधी द्यावा, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अध्यक्ष अब्राहम आवळे, डॉ. संजय आढाव, संजय रेणके, शामकांत सर्वगोडे, दिलीप कांबळे, संजय सोनुले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जैन समाजाचा मूक मोर्चा इचलकरंजी : राजस्थान उच्च न्यायालयाने संथाराबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी येथील सर्वपंथीय जैन समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढून धर्म बचाव आंदोलन करण्यात आले. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर व परिसरातील जैन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जैन धर्मामध्ये संथारा (यम सल्लेखना) याला हजारो वर्षांची परंपराही आहे. असे असताना राजस्थान उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देताना या सल्लेखनेला आत्महत्या आहे, असे म्हणून याला बेकायदेशीर ठरविले आहे. त्यामुळे याचा फेरविचार करावा, अशी मागणी देशभरातील जैन समाजाच्यावतीने आपापल्या प्रांतांमध्ये धर्म बचाव आंदोलनाखाली करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येथेही हा मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, बाळासाहेब चौगुले, ओम पाटणी, महावीर आॅँचलिया, पद्मचंद खाबानी, शशिकला बोरा, संगीता आलासे, जेसराज छाजेड, ऋषभ छाजेड, आदींसह समाजबांधव उपस्थित होते. रिक्षा थांब्याजवळील गर्दी हटविण्याची मागणी इचलकरंजी : येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या बस स्थानक परिसरातील रिक्षा थांब्याजवळ थांबणाऱ्या हातगाड्या, फळ विक्रेते, तसेच चहाची हातगाडी यांना तिथून हटवावे, अशा मागण्यांचे निवेदन येथील इंदिरा आॅटो रिक्षा युनियनच्यावतीने अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना देण्यात आले. या निवेदनात वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच असूनही वाहतूक पोलीस याठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष करतात, असेही नमूद करण्यात आले आहे. शिष्टमंडळात लियाकत गोलंदाज, सुरज बावधनकर, आप्पा चव्हाण, विनोद माळी, आदी उपस्थित होते. इचलकरंजीत संपाबाबत ‘मनसे’चे निवेदन इचलकरंजी : गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सायझिंग कामगारांच्या संपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा मागणीचे निवेदन येथील मनसेच्यावतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले. गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू असताना मनसेने एवढे दिवस गप्प बसून सोमवारी निवेदन दिले. म्हणजे ही केवळ स्टंटबाजी केली की काय, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. (वार्ताहर) वाढीव पाणीपट्टीविरोधात भाजपचा पालिकेवर मोर्चा इचलकरंजी : येथील नगरपालिकेने नव्या वर्षापासून पाणीपट्टीत दीडपट वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोर्चा काढून अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार करून भंडावून सोडले. यावेळी पोतदार यांनी पाणीपट्टी दरवाढीचा विषय कौन्सिल सभेसमोर आणून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. आंदोलनात शहर अध्यक्ष विलास रानडे, जिल्हा सरचिटणीस धोंडिराम जावळे, सुरेश माने, अमित जावळे, नीता भोसले, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, नगरसेवक महेश ठोके यांनीही पोतदार यांना या मागणीचे निवेदन दिले.
वस्त्रनगरीत सोमवार ठरला ‘आंदोलनवार’
By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST