कोल्हापूर : मोकाट जनावरांचा त्रास आता रोजचाच झाला आहे. महानगरपालिका कारवाई करून जनावरांना सिद्धगिरी मठ, पांजरपोळसारख्या संस्थेत दाखल करतात. परंतु कालांतराने हीच जनावरे पुन: पुन्हा रस्त्यावर येतात. आता तर शहराला स्थलांतरित जनावरांचीही संख्या वाढत असल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणूनच महापालिका थेट मालकांवरच फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे.
कोल्हापूर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर आहे. आठ ते दहा ठिकाणी ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: के. एम. टी. व एस. टी. बस, ट्रक अशी अवजड वाहने चालविताना चालकांना बराच त्रास होतो. दुचाकीस्वारांना तर कधी चुकवत तर, कधी वळसा मारूनच जावे लागते. बऱ्याच वेळा अशा मोकाट जनावरांमुळे वाहतूक विस्कळीत, ठप्प झाल्याचे तसेच अपघात झाल्याचे दिसून येते. तेव्हा वाहनधारकांना वाहने सावकाश चालवावी लागणार आहेत.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची महापालिका आरोग्य विभागावर जबाबदारी आहे. महापालिकेने सहायक आरोग्य निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली सहा कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमले आहे. त्यांना एक वाहन देण्यात आले असून पथकाकडून कारवाई केली जाते. पण कारवाई होऊनसुद्धा जनावरांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. म्हणूनच यापुढे थेट मालकांना शोधून थेट त्यांच्यावरच कारवाई करावी लागणार आहे.
- या मार्गांवर वाहने जपून चालवा -
राजारामपुरी
प्रतिभानगर रोड
लक्ष्मीपुरी
गंगावेश रोड
मिरजकर तिकटी
- मोकाट जनावरांचा वाली कोण?
दूध देत होती तेव्हा जनावरांचे मालक त्यांची विशेष काळजी काळजी घेत होते. परंतु जेव्हा दूध द्यायचे बंद झाले, तेव्हा मात्र त्याच जनावरांना मालकांनी रस्त्यावर सोडून दिले आहे. जनावरांना मालक असतात, पण त्याची माहिती महापालिकेला नसते. त्यामुळे अशा मोकाट जनावरांच्या मालकांची नाव, पत्ते दिल्यास त्यांच्यावर कारवाई करता येईल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. या आधी दोन मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.
- कारवाई सुरूच तरीही जनावरे रस्त्यावर -
शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांवर महापालिका आरोग्य विभागाकडून आठवड्यातील दोन दिवस कारवाई केली जाते. महापूर ओसरल्यापासून आजतागायत शहरात अशा जनावरांवर कारवाई केली. या कारवाईत १३२ जनावरे ताब्यात घेऊन ती पांजरपोळ तसेच सिद्धगिरी मठाच्या ताब्यात देण्यात आली. यामध्ये ४० घोड्यांचा समावेश आहे. यातील बहुतांशी जनावरे स्थलांतरित असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. कारवाई करायला गेल्यानंतर काही वेळा जनावरांचे मालक आणि कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंगही घडतात.
कोट -
मोकाट जनावरांच्या मालकांची माहिती आमच्याकडे नसते. जर नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन मालकांची नावे कळविली तर, जनावरांऐवजी मालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. मालकांची नावे न समजल्यामुळे आम्ही जनावरे उचलून पांजरपोळ संस्थेत दाखल करतो. पुढे काही दिवसांनी ही जनावरे परत नेली जातात आणि पुन्हा रस्त्यावर सोडतात. त्यामुळेच महापालिकेने आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका, कोल्हापूर