(अरुण डोंगळे यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दूध उत्पादकांचे वासाचे दूध परत करण्याचे दिलेले वचन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच असल्याची स्पष्ट कबुली ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या वक्तव्याने उपस्थित अध्यक्ष विश्वास पाटील आणि अन्य संचालकही अवाक झाले. मात्र, ऐन सर्वसाधारण सभेच्या तोंडावर विरोधकांना आयते कोलीत दिल्याची चर्चा संघात सुरु आहे.
‘गोकुळ’ची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २४) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत टँकरप्रमाणेच वासाच्या दुधाचा प्रश्न चांगलाच गाजला. विरोधकांनी हा मुद्दा घेऊन तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हैराण केले होते. संघात सत्तांतर होऊन तीन - चार महिने झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. वासाचे दूध शेतकऱ्यांना परत देण्याच्या वचनाचे काय झाले? अशी विचारणा केली असता अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, एकूण संकलनाच्या तुलनेत वासाच्या दुधाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. यामध्ये हस्तक्षेप करत संचालक अरुण डोंगळे म्हणाले, हे दूध परत देणे शक्य नाही. निवडणुकीत दिलेले वचन म्हणजे नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाख रुपयांच्या आश्वासनाप्रमाणेच आहे. डोंगळे यांच्या या विधानाने उपस्थित संचालक चांगलेच अवाक झाले.
नेत्यांना सगळं माहिती नसते
वासाच्या दुधाची टक्केवारी कित्येक वर्षी तीच आहे. याबाबत जुन्या नेत्यांना थोडी माहिती होती. मात्र, या नेत्यांना सगळं माहिती नाही, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.