कोल्हापूर : आंदोलने भासवून अधिकार्यांना वेठीस धरत सेटलमेंट करणार्या नालायक पदाधिकार्यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. पक्षाला सातत्याने वेठीस धरणार्या संजय पवार यांनी प्रथमत: स्वत:ची लायकी पाहूनच माझ्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित करावी. विधानसभा होईपर्यंत या नालायक पदाधिकार्यांना प्रत्युत्तर करून भीक घालणार नाही, असा पलटवार आज (बुधवार) आमदार राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार व विजय देवणे यांच्यावर केला. क्षीरसागर यांनी दैवज्ञ बोर्डिंग सभागृहात पदाधिकार्यांचा मेळावा घेतला. क्षीरसागर म्हणाले, जिल्हाप्रमुख या नात्याने देवणे व पवार यांनी जिल्ह्यात कोणती पक्षबांधणी केली. सोबत असणार्या टोळक्यांना घेऊन सेटलमेंट आंदोलनांशिवाय काहीही केले नाही. पवार यांच्याकडे उत्तर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी होती. शहरवगळता ४४ हजारांचे मताधिक्य विरोधी उमेदवारास मिळाले. दहा-बाराजणांचे टोळके घेऊन ‘धनुष्यबाण-धनुष्यबाण’ असे ओरडत गल्ली-बोळांतून फिरणे म्हणजे प्रचार नव्हे. अशाने मतदान मिळत नाही. ५१ ठिकाणी कोपरासभा तसेच दररोज आठ तास प्रचार केला आहे, असे स्पष्टीकरण क्षीरसागर यांनी केले. यावेळी माजी महापौर विलासराव सासने, पूजा भोर, नगरसेविका सुनीता माळी, सदानंद कोरगावकर, प्रा. विजय कुलकर्णी, धर्माजी सायनेकर, शिवाजी जाधव, आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
आमदारांचा जिल्हाप्रमुखांवर पलटवार!
By admin | Updated: May 22, 2014 01:14 IST