दरम्यान, महापुराचा फटका बसल्याने इंगळी (ता. हातकणंगले) येथील अनेक व्यावसायिकांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अचानक वाढलेल्या पाण्यातून माल बाहेर न काढता आल्याने माल वाहून गेला असल्याने अनेक व्यावसायिक हतबल झाले आहेत. तसेच पिके, जनावरांचा चारा अद्यापही पाण्याखाली असल्याने चारा टंचाईचा प्रश्नही आहे.
पट्टणकोडोली येथील अलाटवाडी आणि इंगळी गावाला पंचगंगा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण गावालाच यावेळी स्थलांतर करण्यात आले होते. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे अनेक व्यावसायिकांना आपला माल बाहेर काढणे शक्य न झाल्याने लाखोंचा माल पुरामध्ये वाहून गेला आहे. नायकवडे फर्टिलायझर या दुकानातील सुमारे पंधरा लाखांची रासायनिक खते व औषधे पाण्यामधून वाहून गेली आहेत. नायकवडे ॲटोमोबाईल्समधील अकरा लाखांचे स्पेअर पार्ट व ऑईल, नायकवडे फुडस् मधील बारा लाखांचा मालही पाण्यामध्ये खराब झाला आहे.