लखन घोरपडे देशिंग चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली म्हैसाळ योजना अखेर साखर कारखानदार व शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेतून सुरू झाली, मात्र ही योजना सुरू होऊनही त्यामागची समस्या अजूनही सुटलेली नाही. शनिवार, दि. २० रोजी सुरू झालेली म्हैसाळ योजना सात दिवसांमध्ये तीन दिवस बंद राहिली आहे. त्यामुळे योजनेच्या पाणी वाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या योजनेचे पाणी मळणगावपासून (ता. कवठेमहांकाळ) पुढे गेले आहे. मात्र पाणी सुरू झाल्यापासून तीन दिवस योजना बंद राहिल्याने पुढील गावांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. त्यातच कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी नरवाड, आरग, बेडग, सलगरे यामार्गे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये दाखल झाले. मात्र गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या योजनेच्या पाण्यापासून तालुक्यातील एकही तलाव अथवा नाला भरला नाही. पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन नसल्याने सतत आवर्तन बंद होत आहे. त्यात तांत्रिक बिघाडही होत आहे . एकंदरीतच केवळ ४५ दिवसांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याला पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत . शनिवार, दि . २० रोजी पाटबंधारे विभागाने ही योजना सुरू केली; मात्र प्रत्येक तालुक्यासाठी पाणी कसे द्यायचे, याचे नियोजन या विभागाने केले नाही. ४५ दिवसांपैकी आठ दिवस चालू-बंद अवस्थेतच निघून गेले. त्यातच काही शेतकरी अग्रणी नदीमध्ये पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत, तर काही भागातून तालुक्यातील तलाव भरून द्या, अशी मागणी होत आहे. परंतु थोड्याच कालावधीसाठी सुटलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न अता उपस्थित होऊ लागला आहे . दरम्यान, म्हैसाळ योजनेपासून निर्माण करण्यात आलेल्या बनेवाडी, डोंगरवाडी उपसा सिंचन योजनांसह पोटकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. त्यातच सध्या पाण्याची अत्यंत गरज असलेल्या जत तालुक्याला पाणी देण्याचा विचारच प्रशासनाने केला नसल्याचे दिसून येते. म्हैसाळ योजनेच्या कालव्याला सलगरेपासून कोंगनोळी, कुकटोळी, सराटी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असून, दररोज लाखो लिटर पाणी फोंड्या माळावर वाया जात आहे .
‘म्हैसाळ’चे पाणी नियोजन कोलमडले
By admin | Updated: February 28, 2016 00:25 IST