निवेदनात म्हटले आहे, कोविड रुग्णांच्या नातेवाईक तसेच अन्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच स्त्राव तपासणी व लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था न केल्यामुळे त्यांची वाहने रस्त्यावरच लावली जातात तसेच पाण्याच्या बाटल्या, शहाळ्याचे रिकामे नारळ, मास्क, ग्लोव्हज, जेवण बांधून आणलेले कागद, पिशव्या व इतर औषधांचे निरूपयोगी साहित्य रस्त्यांवरच टाकून दिले जाते.
परिसरातील सानेगुरूजीनगर, सरस्वतीनगर, स्वामी कॉलनी, पोलीस क्वॉटर्स, पीडब्ल्यूडी क्वॉटर्समधील रहिवाशांना वाहतुकीसाठी हा एकमेव रस्ता असून तेथून ये-जा करणे नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. यापूर्वी परिसरातील काही नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. काहींचा त्यामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांचे नातेवाईक, अन्य रुग्ण व तपासणी व लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी तातडीने स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच विनाकारण परिसरात इतरत्र फिरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.