कोल्हापूर : गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटाेले यांनी राज्य शासनाला दिले आहेत. मुंबईच्या गिरणी कामगारांना घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत शासकीय पातळीवर चालढकल होत असल्याचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या निदर्शनाला आणून दिले होते. याबाबत पटोले यांच्या दालनात ‘म्हाडा’, नगरविकास जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये कामगार नेते उदय भट म्हणाले, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रक समितीने गिरणी कामगारांच्या घराच्या अर्जाची त्वरित छाननी करून सुधारित यादी प्रकाशित करण्याबाबत ‘म्हाडा’ला आदेश दिले होते. लॉटरी लागलेल्या गिरणी कामगार व वारसाला घराचा ताबा त्वरित द्यावा, उर्वरित गिरणी कामगार व त्यांच्या वारसांचे मुंबईतच पुनर्वसन करावे, असेही सूचित केले होते. मात्र, अद्याप याबाबत काेणताही निर्णय झालेला नाही.
यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले. यावेळी आमदार आबीटकर, बी. के. आंब्रे, दत्तात्रय अल्याळकर, दत्तात्रय ताकवणे, शांताराम पाटील, कृष्णा चौगुले आदी उपस्थित होते.