सांगली : वसंतदादांच्या काळात संपूर्ण राज्यात जिल्ह्याचा वेगळा दबदबा होता. वसंतदादांच्याच कृतीचा आणि विचारांचा वारसा घेऊन राज्यात पुन्हा जिल्ह्याचा दबदबा निर्माण केला जाईल. बाजार समितीत काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने व्यापारी व हमाल प्रतिनिधींनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मदन पाटील यांच्यासह उरलेले दोन संचालकही लवकरच भेटतील, असे प्रतिपादन आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात केले. भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी ‘पर्दाफाश’ मेळाव्याचे आयोजन मार्केट यार्डातील सभागृहात केले होते. यावेळी कदम बोलत होते. ते म्हणाले की, सरकार कोणत्या दिशेने जात आहे, याची कल्पना आता सर्वांनाच आलेली आहे. लोकांच्या मनातील खदखदणाऱ्या गोष्टीला फुंकर घालतानाच, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आता पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केली पाहिजे. वसंतदादांच्या काळात राज्यात जिल्ह्याचा वेगळाच दबदबा होता. काँग्रेसला ते पूर्ववैभव प्राप्त होण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. परिवर्तनाचे वारे आता जिल्ह्यात वाहत आहे. सांगली बाजार समिती ताब्यात आली आहे. वास्तविक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घोटाळा झाला. आमच्याच माणसांनी आम्हाला अचानक दगा दिला. त्यामुळे ऐनवेळी आम्हाला नियोजन करावे लागले. पक्षाचे निरीक्षक रामहरी रुपनवर म्हणाले की, सध्या सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. सरकारच्या धोरणांविरोधात सर्वसामान्य माणसांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या नागरिकांच्या पाठीशी काँग्रेसने राहावे. खाऊनही ३0 कोटी शिल्लकबाजार समितीबाबत कदम म्हणाले की, यापुढे बाजार समितीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला जाईल. इतक्या वर्षांत अनेकांनी खाऊनही समितीचे ३0 कोटी शिल्लक आहेत, हे विशेषच! समितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निर्विवाद सत्ता आहे. व्यापारी व हमाल प्रतिनिधींनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मदन पाटील यांच्यासह उरलेले दोन संचालकही लवकरच भेटतील. मुन्ना कुरणेंची घरवापसीविधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गेलेले व भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले माजी नगरसेवक मुन्ना कुरणे पुन्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर आले. त्यांना पक्षात आणण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून प्रयत्न चालू होते. पृथ्वीराज पाटील, पतंगराव कदम यांनी यासाठी प्रयत्न केले. कुरणे यांनी सभेत पक्षाच्या काही नेत्यांमुळे सच्चा कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याची टीका केली. पतंगरावांनीही ही गोष्ट मान्य करून, कुरणे यांची जाहीररीत्या माफी मागितली. पक्षात यापुढे कुरणे यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
मदनभाऊही लवकरच काँग्रेसमध्ये परत येतील !
By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST