अशोक पाटील - इस्लामपूर -कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी उसाला किमान वैधानिक मूल्यानुसार (एफआरपी) दर दिला असला तरी, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र १९०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काही कारखान्यांनी तर परस्परच १९०० रुपयांनुसार उसाचे बिल सभासदांच्या खात्यावर जमा केले आहे.गतवेळच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ऊसदारासाठी वेगवेगळी आंदोलने केली होती. प्रत्यक्ष दर ठरवताना मात्र ते एकत्र आले होते. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर होईपर्यंत कारखाने बंद ठेवणे पसंत केले होते. नेहमीपेक्षा दीड ते दोन महिने गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने, जादा दर मिळूूनही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.यंदा केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. खा. राजू शेट्टी यांनी निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्याने यावेळी त्यांनी ऊसदरप्रश्नी कोणतेही आंदोलन केलेले नाही. आमचेच सरकार असल्याने दर चांगलाच मिळणार, असा त्यांचा दावा आहे, परंतु सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १९०० रुपयांचा दर देऊन केंद्र शासनाच्या एफआरपीला कोलदांडा दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत.जिल्ह्यातील सोनहिरा व क्रांती साखर कारखान्यांनी १९०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करून तो जमाही केला. मात्र वाळव्याच्या हुतात्मा व साखराळेच्या राजारामबापू साखर कारखान्याने कोणतीही घोषणा न करता सभासदांच्या खात्यावर परस्परच १९०० रुपयांप्रमाणे पैसे जमा केल्याचे वृत्त आहे. याबाबत राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील व ‘हुतात्मा’चे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाच्या भीतीने एफआरपीप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला, मात्र सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
साखर कारखान्यांचा एफआरपीला खो
By admin | Updated: December 24, 2014 00:23 IST