शिरोळ : शिरोळ तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवारपासून (दि.१०) गुरुवारपर्यंत (दि.२०) दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सक्त सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या.
शनिवारी शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिरोळ तालुक्यातील जि.प., पं.स. सदस्य, तिन्ही शहरांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी मंत्री यड्रावकर यांनी संवाद साधला.
दहा दिवसांच्या या काळात सकाळी ७ ते ८.३० वाजेपर्यंत केवळ दूध विक्री व किराणा विक्री सुरू राहील. भाजीपाला फिरून विकण्यास या काळात मुभा राहील. इतर सर्व प्रकारचे व्यापार, उद्योग व व्यवसाय बंद राहतील. दरम्यान, गुरुवार (दि.१३) रमजान ईद असल्याने यादिवशी घरी नमाज पढणे व बाजारहाटसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊनमध्ये शिथिलता राहील आणि दुपारनंतर नियमाप्रमाणे लॉकडाऊन निरंतर राहील, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ग्राम समित्यांनी अतिशय चांगले काम केले होते. यावेळी मात्र बाधित रुग्णांच्या घरातील लोक कोणतीही काळजी न घेता बाहेर पडत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. यासाठी ग्रामसमित्यांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत नियम मोडणाऱ्यांवर आवश्यकता असल्यास कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल, तर कडक लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही, असा मतप्रवाह पुढे आल्याने कडक लॉकडाऊनचा निर्णय झाला.
बैठकीस प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट...
जनतेने सहकार्य करावे : यड्रावकर
मुंबईसारख्या शहरात लाॅकडाऊन प्रभावीपणे राबविल्यामुळे तेथील रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे, असे सांगत शिरोळ तालुक्यातील जनतेने याकामी सहकार्य करावे, असे आवाहनही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केले.
फोटो ओळ :
शिरोळ येथे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संवाद साधला.