लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पोलीस निरीक्षक प्रदीप काळे प्रकरणानंतर पोलीस अधिकाऱ्यांतील अंतर्गत ‘लॉबिंग’ची खदखद चव्हाट्यावर आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्याऐवजी डागाळू लागली. अर्थकारणाच्या उद्देशाने जिल्ह्यात आलेल्या काही वरिष्ठांची इच्छापूर्ती होत नसल्याने ते आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गळचेपी करत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच खाकी वर्दीत लपलेले काहींचे मुखवटे समाजासमोर येत आहेत.
दोन-अडीच वर्षांत जिल्ह्यात अवैध व्यवसायांना खीळ बसली असली तरीही ते पूर्णत: बंद आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. तत्कालीन व विद्यमान पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसाय बंदचे आटोकाट प्रयत्न केले, तरीही काही वरिष्ठांच्या आशीर्वादाने दारू, मटका, गुटखा, ऑनलाईन बेटिंग आदी राजरोसपणे सुरूचे चित्र आहे. पो. नि. काळे यांचा आत्महत्येचा प्रयत्न करणारा मेसेज धक्कादायक आहे. त्यामुळे पोलीस दलातही नाराज व खूश असे अधिकाऱ्यांचे दोन गट चर्चेला आले.
‘कलेक्टर’ची बदली, फक्त कागदोपत्री
बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये डी. बी. पथक, गोपनीय व दप्तरी गटांतील काही साहेबांचे लाळघोटे असतात. हेच मर्जीतील ‘तोडपाणी’ करतात. तेच फक्त ‘कलेक्टर’ची भूमिका बजावतात. त्यांची बदली झाली तरीही साहेब स्वत:च्या फायद्यासाठी त्यांना लवकर सोडत नाहीत शिवाय कामाविना फक्त रूबाब मारणारेही काही पोलीस आहेत, यामुळे काही कर्मचाऱ्यांवर कामाचा नेहमीच बोजा दिसतो. त्यातून कर्मचाऱ्यांत व अधिकाऱ्यांत दरी रुंदावते.
वरिष्ठांवर हात उचलणाऱ्यांना अभय
रात्री दोघा मद्यधुंद पोलिसांनी गस्तीवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला; पण दोघाही पोलिसांनी अनेकदा ‘कलेक्टर’ची भूमिका बजावल्याने त्यांच्यावर फक्त मुख्यालयातच बदलीची कारवाई झाली. हेच कृत्य इतर पोलिसांकडून घडले असते तर.. ! अशा प्रवृतीमुळे खात्यात अंतर्गत वाद वाढत आहेत. राजारामपुरी पोलिसांत तर दोन वर्षांपूर्वी अधिकाऱ्यानेच केबिनवर हक्क बजावण्यासाठी चक्क हजेरी मास्तर पोलिसालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविले होते.
अधिकाऱ्याने करून घेतली बदली
काळे यांनी क्राइम ग्रुपवर टाकलेल्या मेसेजचे प्रकरण ताजे असतानाच आर्थिक गुन्हे शाखेतील एका पोलीस निरीक्षकानेही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून विशेष पोलीस महानिरीक्षकांना विनंती करून आपली बदली सातारा येथे दोन दिवसांपूर्वी करून घेतली तसा त्यांनी धाडसी संदेश पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठविला.
वरिष्ठांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक
अधिकारी हे निवृत्तीकडे झुकलेले असतात, त्यांनाही मान, अपमान, कौटुुंबीक अडचणी असतात. परजिल्ह्यांतून आलेल्या काही वरिष्ठांना कनिष्ठ अधिकाऱ्यांचे घेणे-देणे नसते. शिस्तीच्या नावाखाली कनिष्ठ अधिकाऱ्यांची घुसमट होते. त्यांच्या विनंत्यांचा विचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे.