इचलकरंजी : शहरात शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी ६३१.८५ कोटी रुपयांची काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी योजना सरकारने शंभर टक्के अनुदानावर पूर्ण करावी, अशा आशयाचा प्रस्ताव आज (बुधवारी) नगरपालिकेच्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.नगराध्यक्षा बिरंजे यांनी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणाऱ्या योजनेचा आराखडा मंजूर करून तो केंद्र व राज्य सरकारला सादर करण्याच्या विषयावर विशेष सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरूवातीला प्रकल्प अहवाल तयार करणाऱ्या एनजेएस इंजिनिअर्स या संस्थेचे अभियंते एस.जे.सोनटक्के यांनी नळ योजनेविषयी माहिती दिली.काळम्मावाडी नळ योजनेसाठी सन २०३६ पर्यंत एक टप्पा व सन २०५१ पर्यंत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत अनुक्रमे ३.६८ लाख लोकसंख्या व ८ लाख लोकसंख्या गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यावेळी अनुक्रमे पाण्याची गरज दररोज ४९.७२ दशलक्ष लिटर व १०८ दशलक्ष लिटर गृहीत धरली आहे. त्यामध्ये औद्योगिक पाणी दहा दशलक्ष लिटर व सोळा दशलक्ष लिटर, व्यावसायिक ३.१८ व ५.७६, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी १.३८ व ३ याशिवाय गळती आणि वितरणातील गळतीचा तोटा असा गृहीत धरला आहे. योजनेमध्ये काळम्मावाडी धरणातील जलाशयात उभारण्यात येणारे उपसा केंद्र, जॅकवेल व पुरवठा विहिर, पंपगृह, पाण्याची उंच टाकी आणि दीड मीटर व्यासाची ८३.४० किलोमीटर लांबीची दाबनलिका यांचा अंतर्भाव आहे. दाबनलिकेतून पाणी येत असताना ते दूधगंगा नदीवर तीन ठिकाणी व पंचगंगा नदीवर एक ठिकाणी वरून जात असल्याने त्यासाठी पूल बांधण्यात येणार आहे. ३७ किलोमीटरची दाबनलिका जमिनीखालून व उर्वरित दाबनलिका जमिनीवरून जोडली जाणार आहे. याशिवाय केनवडे घाटामध्ये एका बोगद्याची तरतूद करण्यात आली आहे. दाबनलिकेच्या देखभालीसाठी दोन चौक्यांचीही तरतूद आहे.धरणामध्ये इनटेक विहिर, निरीक्षण विहिर, नळ, जोड कालवा, कॉफर डॅम, जॅकवेल, पंपगृह व संपर्क सेतू यावर ७१ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये खर्च येणार आहे. विद्युतीकरण व यांत्रिक कामासाठी १४ कोटी २० लाख ५० हजार रुपये, पंपगृहाच्या दाबनलिकेसाठी ५ कोटी २५ लाख ३० हजार रुपये, उंच टाकीसाठी १ कोटी ७४ लाख, गुरूत्त्व दाबनलिकेसाठी ४९७ कोटी ८१ लाख ७० हजार रुपये, विद्युत पुरवठा गृहासाठी पाच कोटी रुपये आणि त्यास सलग्न असणाऱ्या भू-संपादन, कर्मचारी निवासस्थान, पीक नुकसान भरपाई, परवाना, आदींसाठी ८ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये असा ६०४ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपये खर्च येणार आहे. त्याचबरोबर आस्थापना व साहित्य खर्चाकरीता १२ कोटी ३९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकूण ६३१.८५ कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे. योजना सादर झाल्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये शशांक बावचकर, भीमराव अतिग्रे, रणजित जाधव, अजित जाधव, तानाजी पोवार, अशोकराव जांभळे, सयाजी चव्हाण, बाळासाहेब कलागते, संजय कांबळे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)देखभाल खर्च ९.८७ कोटी योजना कायमस्वरुपी चालविण्याकरीता व्यवस्थापक म्हणून एक उपअभियंता, पर्यवेक्षक म्हणून एक शाखा अभियंता, चार फिटर, दोन वेल्डर, एक जीप चालक, दोन वायरमन, दोन मेकॅनिक, सहा मदतनीस, चार पंपचालक व चार वॉचमन यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे दरवर्षी देखभालीचा खर्च ३ कोटी २० लाख रुपये आणि चालविण्याचा खर्च ६ कोटी ६८ लाख रुपये असा एकूण ९ कोटी ८७ लाख रुपये अपेक्षित आहे.काळम्मावाडी नळ योजनेसाठी सन २०३६ पर्यंत एक टप्पा व सन २०५१ पर्यंत दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यांत अनुक्रमे ३.६८ लाख लोकसंख्या व ८ लाख लोकसंख्या गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ३७ किलोमीटरची दाबनलिका जमिनीखालून व उर्वरित दाबनलिका जमिनीवरून जोडली जाणार आहे.
थेट पाणी योजनेचा प्रस्ताव मंजूर
By admin | Updated: August 13, 2014 23:30 IST