लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : ऐन सणासुदीच्या काळात बालिंगा फिडरवरून विजेचा पुरवठा होणाऱ्या वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, भामटे, चिंचवडे या गावांत विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पिण्याचे पाणी, दळप कांडप यासह अन्य जनजिवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. फुलेवाडी ग्रामीण विभागाच्या बालिंगा सबस्टेशनवरून वाकरे, कुडित्रे, कोपार्डे, आडूर, भामटे, चिंचवडे या गावांना घरगुती व शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. जुलै महिन्यात आलेल्या महापुराने अनेक ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात बुडाले होते, तर विजेचे पोल कोसळल्याने वीजपुरवठा चार ते पाच दिवस खंडित होता; पण यानंतर कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून बहुतांश वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू केला होता. मात्र, यानंतर वाकरे कुडित्रेसारख्या मोठ्या गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन सणाच्या काळात वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे याबाबत कर्मचारी व व बालिंगा सबस्टेशनशी संपर्क केला, तर तेथून उध्दट उत्तर मिळत असल्याने कुडित्रे ग्रामस्थ संतापले असून, याविरोधात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोट : ऐन सणासुदीच्या काळात घरगुती वीजपुरवठा वारंवार सलगपणे चार पाच तास खंडित होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठा व दळपकांडपावर होत आहे. यावर उपाययोजना नाही केली, तर महावितरणच्या कुडित्रे शाखेवर मोर्चा काढणार आहे. ज्योत्स्ना पाटील, (सरपंच, कुडित्रे)
कोट : महापुराच्या काळापासून कुडित्रे गावातील घरगुती वीजपुरवठा सलगपणे कधीच नाही. रात्री-अपरात्री चार -पाच तास सलग वीज खंडित होत असते. याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते. एखाद्या महिन्यात वीजबिल भरणा केला, तर वीज तोडायला कर्मचारी हजर राहतात.
सागर शेलार (ग्रामस्थ, कुडित्रे)