कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९१ वा रविवार असून, एनएसएसचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. या मोहिमेत तीन जेसीबी, सहा डंपर, दोन आरसी गाड्या, तीन औषध फवारणी व दोन पाणी टँकर, १५० कर्मचारी सहभागी झाले होते.
--------------------------------------------------------------------
साखर कामगारांची पगारवाढ लवकरच
यड्राव (जि. कोल्हापूर) : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी गठित केली असून, पगारवाढीचा निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रातिनिधिक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली. साखर कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यातील साखर कारखाना कामगार संघटना व साखर कारखान्यांना शिष्टमंडळासह भेटी सुरू आहेत. यावेळी काळे यांनी ही माहिती दिली.
--------------------------------------------------------------------
तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत ट्रॅक्टर पडून मृत्यू
कवठेमहांकाळ (जि. सांगली) : तालुक्यातील बनेवाडी येथे अनवधानाने विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने तेजस श्रीरंग माळी (वय ३) या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्रीरंग माळी सायंकाळी दोन मुलांसह वस्तीजवळ मळ्यात गेले होते. ट्रॅक्टर विहिरीसमोर लावल्यानंतर मुलांना ट्रॅक्टरवरच पुढे बसवून माळी मळ्यात गेले. दोघांपैकी एका मुलाचा क्लचवर पाय पडल्याने ट्रॅक्टर उताराने पुढे जाऊ लागला. मोठ्या मुलाने कशीबशी उडी मारली; परंतु तेजससह ट्रॅक्टर विहिरीत पडला. तेजसचा बुडून मृत्यू झाला.
--------------------------------------------------------------------
शिधापत्रिकेला आधार लिंक नसल्यास धान्य होणार बंद
सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ ही देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक या मुदतीत लिंक होणार नाहीत, त्यांना १ फेब्रुवारी २०२१ पासून सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
--------------------------------------------------------------------
साताऱ्यातील गोडोली चौक अतिक्रमणमुक्त
सातारा : अनेक महिन्यांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या सातार्यातील गोडोली चौकाने मोकळा श्वास घेतला. सातारा पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रस्त्यावरील सर्व हातगाड्या व अतिक्रमणे हटविल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
--------------------------------------------------------------------
तब्बल ६७५ शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी : निधीअभावी जिल्हा परिषदेच्या सुमारे ६७५ प्राथमिक शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा नियोजनमधून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात शाळा दुरुस्ती आणि नव्या वर्गखोल्यांसाठी १३ कोटी ७३ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे शाळा मोडकळीस आल्या असतानाच अन्यत्र दुसरीकडे शाळा सुरू करण्यात येत आहेत. निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या इमारतींची विशेषत: शाळांची मोठी हानी झाली. त्यातच अनेक वर्षे निधी न मिळाल्याने दुरुस्ती प्रलंबित आहे.
--------------------------------------------------------------------
इन्सुलीतील दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
बांदा (जि. सिंधुदुर्ग) : शेळ्या चरावयास घेऊन जात असताना वाटेत अडवून दोघा बहिणींशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी इन्सुलीतील दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दीपक नाईक (वय २४) व अनिल विष्णू राऊळ (३७, दोघेही रा. इन्सुली गावठणवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघाही संशयितांना बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
--------------------------------------------------------------------
दूरसंचारच्या नेटवर्कचा परुळेत बोजवारा
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग): परुळेच्या आठवडा बाजाराच्या निमित्ताने बँक व इतर शासकीय कामांसाठी आलेल्या ग्राहकांची दूरसंचार नेटवर्क नसल्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. सकाळपासूनच दूरसंचारचे नेटवर्क बंद झाल्याने सर्वच बँकांचे कामकाज ठप्प झाले. आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक आले होते.