प्रयाग चिखली : प्रयाग चिखली, आंबेवाडी, वरणगे, पाडळी या परिसरातील असंख्य गावांमध्ये सतत निर्माण होणारी पूर परिस्थिती ही नैसर्गिक नाही. त्यावर तात्पुरती मदत देण्यापेक्षा पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी, चिखली आंबेवाडी ग्रामस्थांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लागण्यासाठी सरकारवर दबाव आणू, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी शुक्रवारी पुराने नुकसान झालेल्या चिखली, आंबेवाडी परिसराची पाहणी केली. फडणवीस म्हणाले की, चिखली, आंबेवाडीकरांचे पुनर्वसन झाले असले तरीही प्रॉपर्टी कार्ड, वीज, पाणी, गृहकर्ज मिळण्यातील अडचण अशा अनेक समस्या असल्यामुळे लोकांना तिथे राहायची अडचण आहे. त्यामुळे पुनर्वसनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचे काम करू. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
चौकट :
पुनवर्सन करा
यावेळी एस. आर. पाटील व रघुनाथ पाटील यांनी चिखलीतील पूरस्थितीला शहरातील अनधिकृत बांधकामे कारणीभूत असल्याचे सांगितले. चिखलीचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, वरणगे व पाडळी या पूरग्रस्त गावांतर्फे भिकाजी पाटील, शिवाजी गायकवाड, कृष्णात पाटील, दीपक मोरे, अभिजित कदम, राजेंद्र पाटील यांनी निवेदन दिले.