कोल्हापूर : शुद्ध पाणी, शुद्ध हवा, सकस अन्न मिळण्याचा हक्क जसा संविधानाने आपल्याला दिला आहे, तसेच आपली हवा, आपले पाणी शुद्ध ठेवण्याची जबाबदारी देखील संविधानाने आपल्यावर सोपवली आहे. त्याची दखल घेत आज रविवारी (दि. ४) राजेंद्रनगर परिसरातील गोमती ओढा स्वछता मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत गोमती किनारी राहणारे नागरिक मोरेवाडी शंभर फुटी रस्त्यावरील मुख्य पुलाजवळ जमणार आहेत. तिथून ओढा आणि आसपासच्या स्वच्छतेला सुरुवात करणार आहेत.
राजेंद्रनगर, मोरेवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय सोसायटी, शाहू पार्क परिसर, इंदिरा सोसायटी, चिले कॉलनी, म्हाडा कॉलनी, डी. आर. भोसलेनगर, समता कॉलनी, शांतिनिकेतन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी या मोहिमेत भाग घेणार आहेत. मोरेवाडीच्या मागील बाजूस असलेल्या चित्रनगरीच्या डोंगरावर उगम पावणारा गोमती ओढा आपल्या भागातून वाहत पुढे जाऊन जयंती नदीला मिळतो. सुदैवाने कोल्हापूरला समृद्ध निसर्ग आणि पाण्याची मुबलक उपलब्धता लाभली आहे; पण गेल्या काही वर्षांत वाढत्या वासहतींमुळे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण वाढते आहे, तसेच भूजलाची पातळी देखील वेगाने खालावते आहे. याला अनेक बाबी जबाबदार आहेत; पण लोकसहभागातून आणि सजग नागरिकांच्या जाणीवपूर्वक हस्तक्षेपातून आपण काही प्रमाणात आपले पर्यावरण समृद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठीच ही मोहीम आहे.