दानोळी : शिरोळ-हातकणंगले तालुक्यांच्या परीक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या चारशे ते पाचशे ऊस वाहतूकदारांची ऊसतोडणी कामगारांनी फसवणूक करून कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. दरवर्षी होणाऱ्या अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी कारखानदारांनी व शासनाने दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात वाहतूकदारांच्या व्यवसायास मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.तालुक्यांतील प्रत्येक कारखान्याच्या पन्नास ते सव्वाशे ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्यांनी वाहतूकदारांची फसवणूक केली आहे. प्रत्येक टोळीस किमान सात लाख रुपये अॅडव्हान्स याप्रमाणे न आलेल्या टोळींचा उचलीचा आकडा कोट्यवधी रुपयांवर जातो. या फसवणुकीचा फटका वाहतूकदारांसह कारखान्याच्या यंत्रणेलाही बसला असून यावर्षीचा हंगाम संथगतीने सुरू आहे.अनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांच्यातील व्यवहार हा एकमेकांवरील विश्वासावर अवलंबून आहे; परंतु वाढत्या फसवणुकीच्या प्रकारामुळे या विश्वासाला तडा जात आहे. असा प्रकार नवीन नसून दरवर्षी घडत असल्यामुळे यापुढे व्यवहार कसा करायचा व त्यांच्यावर कितपत भरोसा ठेवायचा हा प्रश्न पडला आहे.आतापर्यंत अनेकवेळा फसवणुकीचा प्रकार घडून देखील वाहतूकदार नव्या जोमाने, नवी दुसरी टोळी तयार करून आपला व्यवसाय करत आहेत. पण ऐनवेळी कामगार मिळणे शक्य नसल्यामुळे त्यांची वहाने बसून आहेत. दिलेला अॅडव्हान्स मिळेल की नाही याबाबत शंका आहे. शिवाय चालू हंगामातील व्यवसायही बुडाला, असा दुहेरी आर्थिक फटका वाहतूकदारांना बसला आहे.कारखानदारी ही वाहतूकदार, ऊसतोडणी कामगार व ऊस उत्पादक अशा एकमेकांवर अवलंबून आहे; परंतु कारखानदार हे फक्त वाहतूकदारांना करारबद्ध करतात. मात्र, वाहतूकदारांच्या अडचणी व संकटांशी कारखानदार काहीच देणंघेणं ठेवत नाहीत. अशाप्रकाराबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णायक तोडगा काढण्याची गरज आहे. ( प्रतिनिधी )
ऊसकामगारांचा वाहतूकदारांना लाखोंचा गंडा
By admin | Updated: January 12, 2015 00:36 IST