शहरातील पुराचे पाणी धिम्या गतीने उतरत असून मध्यवर्ती भागातील अंतर्गत रस्ते, घरांतील पाणी ओसरले आहे. महापुरानंतर दलदल आणि घाणीच्या साम्राज्यातून साथीचे आजार पसरू नये यासाठी पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर राबवत आहे. त्यामुळे पाणी ओसरलेला भाग स्वच्छ करून औषध फवारणी करत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
महापुराने शहरातील जुना राजवाडा परिसर आणि माळभाग वगळता संपूर्ण शहरात पाणी होते. शहरातील चारही रस्त्यावर पाणी आल्याने शहराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. अद्यापही नृसिंहवाडी कुरुंदवाड रस्त्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
पूर ओसरल्यानंतर दलदल आणि दुर्गंधीयुक्त पाणी, कचरा यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी याबाबत सतर्क राहून पुराचे पाणी जसे उतरत जाईल, तसे पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जात आहे. स्वच्छतेबरोबर जंतुनाशक फवारणी, धुराची फवारणी, गटारी स्वच्छ करून वाहते केले जात आहे. त्यामुळे शहर स्वच्छ होत असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो -