राजाराम लोंढे : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व राहिले असले तरी या निवडणुकीत आमदार विनय कोरे व आमदार प्रकाश आवाडे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. हे दोघेही तसे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत; परंतु स्थानिक राजकारणात कोरे हे पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या छावणीत आहेत. कोरे यांच्याकडे २६, तर आवाडे यांच्याकडे इचलकरंजी नगरपालिकेतील काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले १९ पैकी १६ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचे त्यांचे दोन सदस्य ताराराणी आघाडी म्हणून निवडून आले आहेत. हुपरीत त्यांच्या आघाडीचे ५ नगरसेवक आहेत. असे एकत्रित २३ सदस्य आहेत. त्यामुळे आवाडे काय निर्णय घेतात याला महत्त्व असेल. महापालिकेतील मतांचा गठ्ठा असणार नाही हे गृहीत धरून पालकमंत्री पाटील यांनी गेले सहा महिने जोडण्या लावल्या आहेत.
काँग्रेसच्या चिन्हावरील ५९ सदस्य आहेत. पालकमंत्री पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी व शिवसेना राहणार असली तरी भाजपची व्यूव्हरचना पाहता, निवडणूक अगदीच एकतर्फी होणार नाही. विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत मंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात निकराची लढाई झाली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे ताकदीने मागे राहिल्याने पाटील यांनी बाजी मारली. गेल्या पाच वर्षांत नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सक्रिय झालेले विविध गट पाहता विधान परिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र राहणार हे निश्चित आहे. मात्र, हक्काचे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले काँग्रेसचे ५९, राष्ट्रवादीचे ४१, शिवसेनेचे ३९ अशी महाविकास आघाडीची १३९ मते आहेत. भाजपच्या चिन्हावरील ७४ सदस्य आहेत. जनता दलाचे १३, तर जनसुराज्य पक्षाचे तब्बल २६ सदस्य आहेत. उर्वरित सदस्य स्थानिक आघाड्या व अपक्ष आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे २१ मते आहेत. त्याशिवाय स्वाभिमानी पक्ष, युवकक्रांती आघाडी आदी आघाड्यांकडे मते आहेत.
गोकुळपासून जोडण्या..
गोकुळमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात माजी आमदार सत्यजित पाटील हे पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांच्या आघाडीत सहभागी झाले होते; परंतु आमदार कोरे हे त्या आघाडीत आल्यानंतर सत्यजित पाटील कार्यकर्त्यांचा दबाव आहे असे चित्र तयार करून विरोधी आघाडीतून बाहेर पडले. त्यावेळी सत्तारूढ आघाडी भक्कम झाल्याचे चित्र तयार झाले होते; परंतु त्याचा राजकीय परिणाम काही झाला तरी चालेल; परंतु कोरे यांना सोबतच घ्यायचे असे सतेज पाटील व मुश्रीफ यांनी ठरवून टाकले होते. त्यामागे विधान परिषद निवडणूक व जिल्हा बँकेचे राजकारण ही बेरीज होती. त्यामुळे कोरे विधान परिषदेत पालकमंत्री पाटील यांच्याच पाठीशी राहतील हे स्पष्टच आहे.
भाजपकडून चाचपणी..
मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजप मित्रपक्षांकडून महादेवराव महाडिक यांच्या घरातच उमेदवारी ठेवण्याचा प्रयत्न आहे. गेल्या निवडणुकीत महाडिक यांच्या पाठीशी राज्यातील सत्तेची ताकद होती. शिवाय गोकुळसारखे महत्त्वाची आर्थिक व राजकीय सत्ता केंद्रे हातात होती. त्या बळावर महाडिक अनेक जोडण्या लावत होते. आता हे दोन्ही घटक त्यांच्यासोबत नाहीत. जिल्ह्यातील साटेलोटेचे राजकारण पाहता ऐनवेळी राहुल आवाडे यांचे नावही चर्चेत येऊ शकते.
पक्षनिहाय मतदार असे-
काँग्रेस - ५९
राष्ट्रवादी - ४१
शिवसेना- ३९
भाजप - ७४
जनसुराज्य- २६
जनता दल-१३
मनसे-२
या आघाड्यांच्या भूमिका ठरणार महत्त्वाच्या
युवक क्रांती (वडगाव) -१४
यादव पॅनल - ४
आजरा विकास आघाडी - ६
शाहू आघाडी (कारंडे, इचलकरंजी) -१०
ताराराणी (चाळके, मोरबाळे)- १२
जांभळे गट - ८
शाहू आघाडी (जयसिंगपूर)- १३
ताराराणी (भाजपप्रणीत) - १०
शिरोळ आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) - ९