कोल्हापूर : लाॅकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून आंदोलनाचा शंख फुंकत राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूरकरांनी आता महावितरणच्या विनंतीनंतर सहकार्याचा हात पुढे करीत थकीत बिले भरण्याचा धडाका लावला आहे. आवाहन केल्याच्या १३ दिवसांतच तब्बल ३४ कोटींच्या बिलांचा भरणा महावितरणकडे झाला आहे. रोज सरासरी सव्वा दोन कोटी रुपयांची वसुली होत असल्याने महावितरणचे रुतलेले चाक वर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोल्हापूरकर वीज बिलांच्या भरणा करण्यात कायमच राज्यात आघाडीवर राहिले आहे. मग ते घरगुती, औद्योगिक असो की कृषिपंप ग्राहक. प्रत्येकवेळी सर्वात कमी थकबाकी असणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा गौरव झालेला आहे; पण चालू वर्षी कोरोनामुळे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे वीज बिलांचा भरणा व वसुली प्रक्रियेला ब्रेक लागला आणि थकबाकीचा डाेंगर वाढू लागला. त्यातच लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावीत यासाठी आंदोलन व शासनाकडून आश्वासन मिळाल्याने नियमित भरणा करणाऱ्यांनीही हात आखडता घेतला. परिणामी कोल्हापूरच्या इतिहासात सर्वाधिक थकबाकी नोंदविली गेली. राज्य शासनाने हात वर केल्याने आणि महावितरणनेही हप्त्याने का असेना भरा अशी विनंती करतानाच कनेक्शन तोडण्याच्या नोटिसाही काढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी बिले भरण्यास सुरुवात केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरकरांनी बिले भरण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळेच थकबाकीदार असलेल्यांपैकी २३ हजार १५८ ग्राहकांनी १३ दिवसांत ३४ कोटी रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे यात घरगुती वीज ग्राहकांची संख्या जास्त आहे.
बॉक्स करणे
१ एप्रिलपासून एकही बिल न भरलेले ग्राहक : ३ लाख ३१ हजार ९५१
मागील १३ दिवसांत बिल भरलेले ग्राहक : २३ हजार १५८
एकूण थकबाकी : २११ कोटी
आतापर्यंत भरलेली थकबाकी : ३४ कोटी
ग्राहकनिहाय वसुलीची रक्कम (थकबाकी)
घरगुती : १३ कोटी (१७२)
वाणिज्य : ९ कोटी (३४)
औद्योगिक : १२ कोटी (३९)
चौकट ०१
आठवड्यात ८३१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
एका बाजूला सहकार्याचे आवाहन, विनंती केली जात असताना महावितरणने कारवाईचाही धडाका लावल्याचे दिसत आहे. आठवडाभरात ८३१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.