कोल्हापूर : उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ मध्य रेल्वेच्यावतीने शुक्रवार (दि. १९) पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तर भारतातील भाविक, प्रवाशांची सोय होणार आहे. तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच केवळ या रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून दर शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही रेल्वे सुटणार असून मिरज, कुर्डुवाडी, पंढरपूर, लातूर, परळी-वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूर, इटारसी, गया, जबलपूर, पारसनाथ मार्गे ती धनबादला पोहोचणार आहे. धनबाद येथून दर सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता ही रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने निघणार आहे. या रेल्वेला १९ डबे असणार आहेत. दरम्यान, या रेल्वेमुळे काशी, गया, पारसनाथ, पंढरपूर, बार्शी, शेगाव आणि देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.