धामोड : खामकरवाडी लघू पाटबंधारे तलावात पाणी साठविण्याच्या दिवसापासून लवकर भरणारा व लवकर आटणारा अशी ख्याती असलेला हा पाझर तलाव जल संधारणाच्या बेपर्वाईमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळ्यापूर्वी धरणातील दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर काढण्यासाठी तलावाचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला; पण हा दरवाजा अर्धवट स्थितीत अडकल्याने व पूर्ण बंद न झाल्याने तलावाच्या मुख्य दरवाजातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तलावाची पाणीपातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. परिणामी, शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे येथील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन या मुख्य दरवाजाची गळती काढावी, अन्यथा येथील शेतकऱ्यांवर पाणीटंचाईची कुऱ्हाड कोसळेल.तुळशी व धामणी खोऱ्याच्या मध्यवर्ती खामकरवाडी येथे ‘खडकीचा ओढा’ येथे कै. अंबाजी बा. खामकर (गुरुजी) व माजी आमदार संपतराव पवार-पाटील (बापू) यांच्या विशेष प्रयत्नातून खामकरवाडी, अवचितवाडी दरम्यान ११६२.७८ सहस्त्र घ. मी. इतकी पाणी साठवण करणाऱ्या तलावाची निर्मिती २००० साली झाली; पण मुळातच या प्रकल्पाचे काम निकृष्ट झाल्याने हा प्रकल्प अनेक समस्यांच्या विळख्यात सुरुवातीपासूूनच सापडत गेला. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत हा प्रकल्प ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशा स्थितीत येऊन ठेपला; पण असे असले तरी १४ ते १५ वेळा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असूनदेखील वारंवार लागलेल्या गळतींमुळे तो लवकरच आटत होता. परिणामी एप्रिल, मे दरम्यान पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. या प्रकल्पामध्ये १६.३१ हेक्टर इतके क्षेत्र बुडीत गेले असले, तरी १९५ हेक्टर इतक्या क्षेत्राला यामधील पाण्याचा लाभ होतो आहे. या धरणाची लांबी २०४ मीटर इतकी असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावाच्या उजव्या बाजूस असणाऱ्या खामकरवाडीकडील सांडव्यातून प्रतिसेकंद १४५.९० घ. मी. इतक्या पाण्याचा विसर्ग होत असतो; पण यावर्षी तलावाच्या मुख्य दरवाजाला लागलेल्या गळतीमुळे गेल्या १४ वर्षांत जुलै संपला, तरी हा तलाव अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन दरवाजाची गळती काढावी, अन्यथा धरण कोरडे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त हेत आहे.
खामकरवाडी पाझर तलावास गळती
By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST