दत्तात्रय पाटील --म्हाकवे -सर्वत्र सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे तहान लागल्यानंतर विहीर खुदाईच्या प्रकाराप्रमाणे शासनाने आता गांभीर्याने घेत ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे; परंतु तब्बल दहा वर्षांपूर्वीच केनवडे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीने हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. गावच्या तलावाच्या वरच्या बाजूला पाणी स्रोतांमध्ये ठिकठिकाणी बंधारे व चरी मारून पाणी अडविले आहे. त्यामुळे डोंगर उतारावर हा तलाव असतानाही आणखी महिनाभर पाऊस नाही पडला तरीही गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. माजी सरपंच दत्ता पाटील यांची धडपड व विशेष प्रयत्न यामुळेच गावाला जलसमृद्धी लाभल्याचेही ग्रामस्थ सांगतात. १९७२ मध्ये दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषदेमार्फत गावच्या उत्तरेला असणाऱ्या डोंगर कपारीमध्ये पाझर तलाव बांधण्यात आला; परंतु डोंगर उतार जास्त प्रमाणात असल्यामुळे या तलावात फारसा पाणीसाठा होत नव्हता. २००३ मध्ये आमदार हसन मुश्रीफ यांचे सहकार्य आणि लघुपाटबंधारे विभागाच्या मदतीमुळे या तलावाचे भाग्यच उजळले.माजी सरपंच दत्ता पाटील यांनी पाच ते सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या तलावाची उंची दहा फुटाने वाढवून घेतली. तसेच तलावाच्या उत्तरेकडील भाग हा खडकाळ व डोंगराळ असल्यामुळे पावसाळ्यातील बहुतांशी पाणी ओढ्या-नाल्यातून वाहून जात असे. याचा विचार करून ११ व्या वित्त आयोगातून तलावाच्या वरील भागात चार कि.मी.च्या चरी मारण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत स्तरावरून वळण बंधारेही बांधण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवून ते जिरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्याची फलश्रुती आज दिसत आहे. सर्वत्र पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना येथील ग्रामस्थांसह त्यांच्या जनावरांना मुबलक व शुद्ध पाणी मिळत आहे. तीन हजारांहून अधिक लोकवस्तीचे हे गाव आहे. यापूर्वी पाण्यासाठी खासगी विहिरींचा तसेच कूपनलिकेचा आधार घ्यावा लागत होता; परंतु दूरदृष्टी आणि नियोजनामुळे पिण्याच्या पाण्यासह डोंगर कपारीतील १०० एकरांवरील पिकांनाही अप्रत्यक्षरीत्या मुबलक पाणी मिळत आहे. तलावाची उंची वाढविणे, जॅकवेल बांधणे, पाणी योजना, आदी विविध कामांसाठी शासन स्तरावरून या गावाला अर्धा कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, केनवडे गावाप्रमाणे सर्वच गावांनी याचा आदर्श घेऊन जलस्रोत वाढविला, तर गावागावांत जलसमृद्धी अवतरायला वेळ लागणार नाही.‘ मी सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, आदी गावांना भेटी दिल्या. त्यांनी निर्माण केलेले जलस्रोत पाहिले आणि त्याप्रमाणे आपल्याकडेही काम करता येईल याचा विचार केला आणि आज सरकार ज्या जलयुक्त शिवाराचा पाठपुरावा करीत आहे. ती संकल्पना मी दहा वर्षांपूर्वीच ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबविली, त्यात यशस्वी झालो. त्याचीच फलश्रुती म्हणून आज गावात जलसमृद्धी साकारली आहे.- दत्ता पाटील-केनवडेकर, माजी सरपंच.
दूरदृष्टीमुळेच केनवडेत जलसमृद्धी
By admin | Updated: May 24, 2016 00:50 IST