सावरवाडी : गेली आठ दिवस महापुरात बुडालेल्या भोगावती नदीपात्रातील कसबा बीड ते महे दरम्यानच्या बंधाऱ्यावरील पाणी गुरुवारी रात्री उतरले आहे. पूरपरिस्थितीमध्ये चाळीस गावांची ठप्प झालेली ग्रामीण वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस गावांची ग्रामीण वाहतूक या बंधाऱ्यावरून होत असते. जोरदार अतिवृष्टीमुळे दि २२ जुलैरोजी या बंधाऱ्यावर पुराचे पाणी आले होते. तुळशी, भोगावती या दोन नद्यांचा संगम कसबा बीड येथे आहे. दोन नद्यांच्या पात्रात पाण्याचा प्रवाह जादा असतो. पाण्याच्या जादा तुंबीमुळे पात्रातील बंधारा पाण्याखाली बुडाला होता .
आठ दिवसांच्या कालावधीत कसबा बीड-महे बंधारा पाण्याखाली गेल्याने करवीर पश्चिम भागातील चाळीस गावांची वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी रात्री पाणी उतरल्याने आज शुक्रवारी कोल्हापूर शहराकडे ये-जा करणारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
फोटो ओळ : आठ दिवस महापुरामुळे कसबा बीड-महे (ता. करवीर) भोगावती नदी पात्रातील बंधारा खुला झाला.